नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री वादळी पावसाने थैमान घातले. दोन व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला, तर अमरावती जिल्ह्यात सुमारे 112 घरांची पडझड झाली. नागपूर जिल्ह्यात 25 हून अधिक आणि वर्धा जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली. काही भागात गारपिटीने शेत पिकांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाच्या नजर अंदाजानुसार जिल्ह्यात एकूण 522 हेक्टरमधील पिकांची हानी झाली असून गहू, कांदा, मिरची, निंबू, संत्री, आंबा आणि काढणीला आलेल्या हरभरा पिकाला फटका बसला आहे.
अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 288 हेक्टरमधील पिकांचे नुकसान अंजनगाव सुर्जी तालुक्यात झाले आहे. 160 हेक्टरमध्ये नुकसान अमरावती तालुक्यात झाले आहे. भातकुली तालुक्यात 34, नांदगाव खंडेश्वर 28 आणि दर्यापूर तालुक्यात 12 हेक्टरमधील पिकांची हानी झाली आहे. जिल्ह्यात एका घराची पूर्णत: तर 111 घरांची अंशत: पडझड झाली आहे. 2 मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे.