बालासोर येथील घटनास्थळाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आढावा घेतला. रेल्वेमंत्री यांनी सांगितले की, ओडिशाच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हा मोठा अपघात आहे. आम्ही सर्व दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करतो. काल रात्रीपासून रेल्वेचे पथक, एनडीआरएफ, एसडीआरएफ बचाव कार्यात गुंतले आहेत. या दुर्घटनेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला त्यांच्या दु:खात सहभागी आहे. सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल.
ओडिशात तीन रेल्वेच्या धडकेत किमान 288 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 900 लोक जखमी झाले. बेंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बालासोर येथे मालगाडीचा भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त रेल्वे डब्यांमध्ये अडकलेले प्रवासी आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव आणि मदतकार्य सुरुच आहे. दरम्यान, बालासोर आणि आसपासच्या वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. एससीबीएमसीलाही सतर्क करण्यात आले आहे.