Breaking News

BJP गोपीनाथ मुंडेना विसरतेय!

‘शेटजी -भटजीं’चा पक्ष ही विरोधकांकडून होणारी भारतीय जनता पक्षावरील टीका मोडून काढण्यासाठी सातत्याने काम करणारे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र बीड जिल्ह्यातील समन्वय समितीच्या मेळाव्यात न लावल्याने नाराजी व्यक्त झाली. या घटनेमुळे भाजपमधील बदललेल्या पक्षीय रचनेची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

‘माधव’ सूत्राला चालना देत मराठा नेत्यांनी पक्षात यावे यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी सुरुवात केली. एकदा तर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ गोपीनाथ मुंडे यांनी उदयनराजे भोसले यांच्या हस्ते घडवून आणला होता. ‘छत्रपती शिवाजीराजे यांचे आठवे वंशज’ असे म्हणत तेव्हा भाजपने तुताऱ्या फुंकल्या होत्या. आता मराठा आरक्षणाची मागणी जोरदारपणे पुढे येताना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भोवताली मराठा नेत्यांची ढाल उभी केली असताना गोपीनाथ मुंडे यांचे विस्मरण भाजपला परवडेल का, असा प्रश्न विचारला जात आहे.

बीड वगळता अन्य एखाद्या जिल्ह्यात समन्वय समितीच्या मेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र न लावणे, राजकीय धबडग्यातील चूक मानली जाणार नाही. मात्र, बीड जिल्ह्यात फलकावर गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र न लावण्याची कृती राजकीय चूक ठरण्याची शक्यता अधिक आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाने यशवंतराव चव्हाण यांना आदर्श मानून त्यांचे छायाचित्र फलकावर लावले. बाळासाहेब ठाकरे आणि सोबतीला आनंद दिघे यांची छायाचित्रे फलकावर लावण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा गट आग्रही असतो आणि गोपीनाथ मुंडे यांच्या छायाचित्रासाठी भाजपमधून कोणी आग्रही नसतो, याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

‘मोदी है तो गॅरंटी है’ या विश्वासातून बाकी कोणी असो की नसो, भाजपचा विजय नक्की असणार आहे, हा संदेश आता रुजलेला आहे. पण भाजप वाढीसाठी झटणारे नेते आता भाजप फलकावर नकोसे झाले आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे. याची ओरड होईल असे लक्षात आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे एक छायाचित्र नंतर लावण्यात आले. जे काही फलकावर घडते आहे ते बरहुकुम आहे, असेही माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी नंतर स्पष्ट केले. याचा अर्थ राज्यस्तरावरुन भाजपला घडविणाऱ्या नेतृत्वाचे विस्मरण झाल्याचे स्पष्ट आले आहे.

मुंडे यांनी पक्ष बांधताना अनेक नेत्यांना आवर्जून पुढे आणले. शिवराज पाटीलसारख्या सतत निवडणुका जिंकणाऱ्या नेत्याला पराभूत करणाऱ्या रुपाताई पाटील निलंगेकर यांच्यामागे शक्ती उभी केली. प्रसंगी काँग्रेस नेत्यांबरोबर त्यांनी मैत्रसंबंध जपले. भाजपला यश मिळावे म्हणून वसंतराव भागवत यांनी दाखवलेली पायवाट अधिक रुंद करत त्याचा पक्का रस्ता तयार व्हावा यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी प्रयत्न केले. पण आता त्यांचे विस्मरण होते आहे, हे सांगावे लागत आहे. मुंडे यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील फलकावरील चुकीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

About विश्व भारत

Check Also

अहमदाबाद विमान अपघातासाठी प्रफुल्ल पटेल जबाबदार : नाना पटोलेंचा गंभीर आरोप

तत्कालिन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात विमानांच्या खरेदीबाबत …

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळच्या आमदाराला राजकारण कळत नाही

महाराष्ट्र : मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे विधान परिषद सदस्य परिणय फुके …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *