नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी तालुक्यातलं वाघदरी गाव. प्रांतवार रचनेनंतर अडीचशे लोकसंख्येचं हे गाव आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात आलं मात्र महाराष्ट्राच्या नकाशावर अजूनही गावाची नोंद नाही. नकाशावर नोंद नसल्यमुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
किनवट या गावाची महसुली नोंदच नसल्याने या गावात कुठल्याच सुविधा पोहोचल्या नाहीत. जवळपास साडेचार हजार हेक्टर शेतजमीन असली तरी महसुली नोंद नसल्याने कोणाकडेच जमिनीचा सातबारा नाही. सातबारा नसल्याने पीकविमा, अनुदान अश्या कुठल्याही योजनेचा फायदा या गावाला मिळत नाही. जात प्रमाणपत्र नाही, वनहक्क जमीन पट्टे नाहीत. आधार कार्ड आणि राशन कार्ड तेव्हढे महाराष्ट्राचे असल्याचा पुरावा म्हणून त्यांच्याकडे आहे. सर्वात अडचणीची बाब म्हणजे या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही.
गाव नकाशावरच नसल्याचे कळाल्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी पायी आणि दुचाकीवर प्रवास करत गावात भेट देऊन समस्या जाणून घेतलीय. गावाची ई टी एस मोजणी सुरू आहे, गावाची आकारबंदी करण्याचे काम सुरू करण्यात आलंय. काही दिवसात आकारबंदी करून हे गाव महाराष्ट्र आणि देशाच्या नकाशावर येईल अशी अपेक्षा आहे.