शासनाच्या लालफितशाहीचा कारभार आणि प्रशासन किती गेंड्याच्या कातडीच असतं याचा नमुना बीडमध्ये पाहायला मिळाला आहे. हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच उरलेले हप्ते मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या एका उपोषणार्थीकडे लक्ष द्यायला जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला वेळ मिळाला नाही.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच थंडीने कुडकुडत या उपोषणार्थी वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यूला स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार की प्रशासन आणि त्यांची दिरंगाई ? याची चौकशी होणे आता गरजेचे असल्याचा सवाल नागरिकांनी केला आहे.
माहितीनुसार, आप्पाराव भुजाराव पवार हे वासनावाडी येथील रहिवासी आहेत. ते कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. शासनाने मंजूर केलेले घरकुल तातडीने बांधून देण्यात यावे. यासह इतर मागण्यांसाठी पवार हे कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषण करत होते.
मात्र या उपोषन करणाऱ्या व्यक्तीची साधी दखलही घ्यायला जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांच्यासह प्रशासनाला वेळ मिळाला नाही. दरम्यान पवार यांचा सकाळी मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याबाबत उपोषणकर्त्यांच्या कुटुंबियांनी याविरोधात आवाज उठवला आहे.
याला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. रेती तस्करीत प्रशासन तल्लीन आहे. सामान्यांकडे लक्ष दयायला वेळ नाही. वारंवार निवेदने आणि अर्ज देऊन देखील त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळेच त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली आणि अखेर थंडीने कुडकुडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केलाय.