नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचार संहितेचा भंग केला आहे. त्यामुळे याची तातडीने दखल घेऊन गडकरींविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
तक्रारीनुसार, निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करू नये, असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. तरी देखील गडकरी यांनी त्यांच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केला. १ एप्रिल २०२४ रोजी एनएसव्हीएम फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी १२ ते १ दरम्यान वैशाली नगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी करण्यात आले. हा सरळ सरळ कायद्याचा गैरवापर असून अत्यंत गंभीर प्रकार आहे. शाळकरी मुलांचा राजकीय प्रचारासाठी वापर केल्याबद्दल या शाळेच्या प्राचार्यांनाही निलंबित करावे. राजकीय प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करणे हे बाल कामगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन तर आहेच तसेच मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ साली दिलेल्या आदेशाचेही उल्लंघन आहे, याकडे लक्ष वेधत निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, असेही लोंढे म्हणाले.
प्रचार करणार नाही म्हणणारे गल्लीबोळात
लोकसभा निवडणुकीच्या आधी एका कार्यक्रमात गडकरीच म्हणाले होते की, “मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही, पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही, मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका”, परंतु निवडणुका जाहीर झाल्यानंतर गडकरी यांना नागपूरच्या गल्लीबोळात फिरावे लागत आहे, असा टोलाही लोंढे यांनी लगावला.