अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. ज्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला. त्यांना अखेरचा निरोप देताना बारामतीसह महाराष्ट्राचे डोळे पाणावले होते. शरद पवार आणि पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तसंच काम करणारा लोकनेता गेला अशी भावना जनतेच्या मनात होती आणि आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने शोकसभा आयोजित केली होती. या शोकसभेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विमानाचा अपघात झाला त्यावेळी काहीतरी गडबड झाली असं म्हटलं आहे. तर, विमान इलेक्ट्रिकरित्या पाडण्यात आल्याची माहिती आहे.
छगन भुजबळ यांनी काय म्हटलं आहे?
अजित पवार आपल्यातून निघून गेले आहेत. मी साधारण तीन ते चार महिन्यांनी कॅबिनेट मिटिंगला जायचं ठरलं. त्याआधी साधारण मी आणि अजित पवार अर्धा दिवस बरोबर होतो. २८ जानेवारीला वर्तमानपत्र वाचत असताना समीर आला आणि सांगितलं की दादांच्या विमानाला अपघात झाला. नंतर त्याने सांगितलं दादा गेले. अजित पवार गेले यावर विश्वासच बसत नाही. देशात विमानांचे आणि हेलिकॉप्टरचे अनेक अपघात झाले. महाराष्ट्रात अशा प्रकारचा भयंकर अपघात आणि तो देखील इतक्या मोठ्या व्यक्तीच्याबाबतीत मी पहिल्यांदाच अनुभवतो आहे. असं छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या शोकसभेत सांगितलं.
काहीतरी गडबड झाली आहे..
छगन भुजबळ म्हणाले, मी जेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो तेव्हा मला हा प्रश्न पडला की विमान इथे आलंच कसं काय? टेबलटॉप आहे तर विमान साधारण ७० फूट खाली कोसळलं? सीसीटीव्ही कव्हरेज आम्ही पाहिलं एक घिरटी घालून विमान गेल्यानंतर दुसऱ्या घिरटीच्या वेळी सरळ असलेलं विमान पलटी मारताना दिसतं आहे आणि त्यानंतर होत्याचं नव्हतं झालं. चौकशी होईल, मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण कुठे तरी काही तरी गडबड झाली आहे. इंजिनात किंवा रडारमध्ये. या सगळ्याची चौकशी होईल, त्याची माहितीही येईल. पण ही सोन्यासारखी माणसं गेली ती कशी परत येतील? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला. अजित पवारांचं आयुष्य पाहिलं, तर अजित पवार लहान असतानाच त्यांचे वडील गेले. शरद पवारांच्या देखरेखीखाली अजितदादा लहानाचे मोठे झाले. अचूक वेळी येणं, कामं करणं या सगळ्या गोष्टींचा ठेवा शरद पवारांकडूनच त्यांच्याकडे आला. असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत-भुजबळ
शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, क्रीडा क्षेत्रातले प्रश्न असोत दादा सोडवायचे. त्यांचा दराराही होता. सकाळपासून काम करणं हे त्यांनाच शक्य होतं. सकाळी ६ किंवा ७ वाजता बैठक घेण्यास सुरुवात करायचे. टापटीप, स्वच्छता याबाबत त्यांचा स्वभाव काटेकोर होता. अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकता येतील. मी १९९१ मध्ये सुधाकरराव यांच्या मंत्रिमंडळात होतो. ९३ ला शरद पवार आले, त्यानंतर दादा मंत्रिमंडळात आले, तेव्हापासून आम्ही एकत्र काम करत आहोत अशी आठवणही छगन भुजबळ यांनी सांगितलं.
विश्वभारत News Website