विश्व भारत डेस्क
: बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीचं आमिष दाखवत तिघांना लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिघांकडून तब्बल १८ लाख ५० हजार रूपये उकळले. पैशांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आर्वीतील एका, चंद्रपुरामधील दोन आणि अमरावतीच्या एका आरोपीचा समावेश आहे.
माहितीनुसार,आर्वी येथील नरसिंग सारसर या व्यक्तीने आर्वी येथीलच रितेश राजेश टाक या तरुणाला बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई पदावर नोकरी देतो, त्यासाठी रजनी चौधरी यांना पैसे द्यावे लागतील असे सांगितले. रजनी चौधरी या वर्ध्याला येणार असल्याचे कळताच नरसिंगसोबत रितेश वर्ध्याला ५० हजार रुपये घेऊन गेला.वर्ध्यातील एका बॅंकेजवळ त्यांनी फॉर्म भरुन पासपोर्ट फोटो घेतले.दोन ते तीन महिन्यानंतर पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली.ते पैसे देखील रितेशने दिले.
मात्र,पैसे दिल्यानंतरही नोकरी न लागल्याने रितेशने विचारणा केली. रजनी चौधरी यांनी सध्या बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जागा रिकामी नाही,असे सांगितले. काही दिवसांनी पंकज झोडगे याने नरसिंग सारसर यांच्याकडे १ लाख रुपयांचा धनादेश रितेशला देण्यासाठी दिला. मात्र, चेक खोटा असल्याचं समोर आल्यावर फसवणूक झाल्याचं सदर व्यक्तीला समजलं.
काही दिवसांनी आर्वी येथील सावरकर नामक युवकाला देखील नोकरीचे आमिष देऊन ८ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला. तसेच विरसिंग सारसर या व्यक्तीलाही ५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे कळले.याप्रकरणीपोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती दिली.