विश्व भारत ऑनलाईन :
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचं शिवसेना हे नाव कुणाला मिळणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.याचा निकाल लागण्यासाठी आणखी तीन ते चार महिने वेळ लागण्याची शक्यता आहे, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केले.तोपर्यंत चिन्ह आणि पक्षाचं नाव कुणालाही न देता त्याऐवजी इतर पर्याय देण्याची शक्यता आहे,असेही मत एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केले.
पक्षामध्ये ज्या-ज्या वेळी फुट पडते,त्या-त्या वेळी त्याबद्दल निर्णय हा निवडणूक आयोग घेते. 1967 रोजी ज्यावेळी काँग्रेसमध्ये पहिल्यांदा फुट पडली होती त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात ही गोष्ट गेली होती. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय निवडणूक आयोग घेईल,असे निर्देश दिले होते. अशा प्रकारात बहुमताच्या नियमाच्या आधारे निर्णय घेण्यात येतो.”
निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाविरोधात दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येणं शक्य असल्याचं एस वाय कुरेशी म्हणाले. पक्षाचं चिन्ह गोठवल्यानंतर पक्षांना उपलब्ध असलेल्या चिन्हांपैकी एखादं चिन्ह उपलब्ध असेल तर ते निवडता येतं. किंवा जर त्यांच्याकडे एखादं चिन्ह असेल आणि ते देशातील कोणत्याही पक्षाच्या चिन्हासोबत मिळतंजुळतं नसेल तर ते त्यांना देता येतं असं एस वाय कुरेशी यांनी म्हटलं.