विश्व भारत ऑनलाईन :
महाराष्ट्रातील 44 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी निघाले.आदेशात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचीही बदली झाली आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांची बाळासाहेब ठाकरे,कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प संचालक म्हणून बदली झाली आहे. त्यांना साईड पोस्ट देण्यात आली आहे. याच्या मागे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहेत का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. मागच्या महिन्यात तानाजी सावंत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यात वादाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळेच की काय कौस्तुभ दिवेगावकर यांना साईड पोस्ट देण्यात आलीय, असं बोललं जात आहे.
नेमकं काय प्रकरण?
तानाजी सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सोमनाथ रेड्डी यांना कौस्तुभ दिवेगावकर यांनी फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला होता. रेड्डी यांनी तसं लेखी सावंत यांना कळवलं होतं. यावरून तानाजी सावंत यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे दिवेगावकर यांची तक्रार केली होती. त्यामुळे सावंत आणि दिवेगावकर यांच्यातील कलह समोर आला होता. यावर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मात्र मौन बाळगला होता.
बदलीनंतर काय म्हणाले दिवेगावकर?
उस्मानाबादच्या लोकांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामासाठी मला नावाजले. खूप प्रेम दिले. शेतकऱ्याचा हक्काचा कलेक्टर झालो. अजून काय हवे? खूप आभार ! मी सेलिब्रिटी नाही. आणि व्हायची इच्छाही नाही. पण काल रात्रीपासून जो प्रेमाचा वर्षाव आपण केलात त्याचा मी आनंदाने आणि नम्रपणे स्वीकार करत आहे. इतकी माणसे जोडली जातात याचे अप्रूप वाटते. पाय जमिनीवर राहावेत हेच मागणे. पुन्हा एकदा धन्यवाद, असं दिवेगावकर म्हणाले. कृषी क्षेत्रात काम करता येईल यात समाधान आहे, असं देखील ते म्हणाले.
विश्वभारत News Website