विश्व भारत ऑनलाईन :
सध्या नागपूर ट्रॉफिक पोलिसांविरोधात नागरिक सोशल मीडियावर रोष व्यक्त करीत आहेत. रोषच नव्हे तर तक्रारीही करीत आहेत. अलीकडेच शहरातील सक्करदरा भागातील तिरंगा चौकातील एका हॉटेलसमोर दुचाकी पार्क केली होती. वाहतूक पोलिसांनी कंत्राट दिलेल्या टोइंग व्हैनने दुचाकी उचलत असताना हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने त्याला विरोध केला होता.
यावरुन झालेल्या वादानंतर पोलिसाने त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तिथे उपस्थित नागरिकांनी त्यास विरोध केला. नागरिकांपैकी काहींनी ही घटना कॅमेऱ्यात चित्रीत केली. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तरीही, पार्किंगमध्ये असतानाही गाडी उचलून घेऊन जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
एकीकडे शहरात अतिक्रमणामुळे फुटपाथ आणि पार्किंगच्या जागा गिळून घेतल्या आहे. मात्र दुसरीकडे जागोजागी खासगी कंत्राटदार नेमून पे अन्ड पार्कच्या नावावर नागरिकांकडून बेकायदेशीर रित्या पैसे उकळण्यात येत आहे. तर आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी पैसेच मोजत राहावे का, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दुचाकीची उचल करणे बेकायदेशीर आहे. यावर सरकारने लक्ष देऊन नाहक नागरिकांना त्रास देऊ नये, अशी मागणी वाढत आहे.
टोईंग कारवाईचा भूर्दंड झाला दुप्पट
रस्त्यावर बेशिस्तपणे वाहन पार्क करून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या गाड्यांवर टोईंग वाहनांद्वारे कारवाई केली जाते. यात प्रामुख्याने दुचाकींवरच सर्वाधिक कारवाई केली जाते. सध्या रस्त्याकडेला किंवा वाहन उभी करण्यास प्रतिबंधित ठिकाणी दुचाकी उभी केल्यास २०० रुपयांचा दंड आकारला जातो. त्यात आता टोईंगच्या अतिरिक्त २०० रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे पकडलेल्या दुचाकी सोडविण्यासाठी ४०० रुपयांचा भूर्दंड भरावा लागणार आहे.