महानिर्मितीच्या कोल वॉशरीजमधील नाकारलेल्या कोळशाच्या विक्रीत गैरप्रकार झाल्याची चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. त्याचप्रमाणे नागपुरातील रेती घोटाळय़ाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राजकारणी आणि बढ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. रेतीत गुंतलेल्या पोलीस अधिकारी,तहसीलदार,नायब तहसीलदारांची चौकशी होऊ शकते.
वॉशरीजच्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. त्यांनी त्यांच्या अहवालात केलेल्या शिफारसीप्रमाणेच वॉशरी सुरू केली. मात्र यात काही चूक असेल तर चौकशी केली जाईल. काही लोकांनी कोळसा रोखण्याचा इशारा दिला. यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होईल, त्यामुळे अशा गोष्टींना थारा दिला जाणार नाही. रेती घोटाळय़ाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस यांनी चौकशीची घोषणा केली आहे.