शाळा सुरू होऊन तीन आठवडे झाले तरी नागपूर जिल्हा परिषदेच्या तब्बल २५ शाळांमध्ये शिक्षक नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शिक्षक नसलेल्या शाळेतील काही विद्यार्थी थेट जिल्हा परिषद मुख्यालयात पोहचले. काटोल जिल्ह्याच्या मलकापूर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 15 विद्यार्थी आहेत. दररोज हे विद्यार्थी तयारी करून शाळेत जातात. मात्र शिक्षक नसल्याने त्यांना परत घरी जावे लागते. त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. शिक्षक मिळावे, यासाठी हे विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या मुख्यलयात पोहचुन शिक्षक द्या, अशी मागणी केली. नागपूर जिल्हा परिषदेत आलेल्या या विद्यार्थ्यांना अखेर शिक्षक मिळाले. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी शिक्षकाची त्वरित नेमणूक केली.
नागपूर मनपा शिक्षकांविना
अशीच काहीसी अवस्था नागपूर मनपा शाळांची आहे. नागपूर मनपाच्या माध्यमिक विभागाच्या ३० शाळा आहेत. बरेच शिक्षक सेवानिवृत्त झालेत. त्यामुळे मनपाच्या शिक्षण विभागाने ६३ जागांसाठी गेल्या आठ दिवसांपूर्वीपासून मुलाखती घेतल्या. शाळा सुरू होऊन २१ दिवस झाले, तरी अद्याप बऱ्याच शाळांमध्ये बऱ्याच विषयांचे शिक्षक नाहीत. दुर्गानगर हायस्कूल येथे गणित शिकवणारे शिक्षक नाहीत. मराठीच्या शिक्षिका पाच दिवसांनंतर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या भरतीसाठी फिरणाऱ्यांनी मनपा शिक्षकांची भरती आणि स्वच्छतागृहांची स्वच्छता राखल्यास विद्यार्थी आपोआप मिळतील. एकीकडे दिल्लीतील सरकारी शाळांनी कात टाकली असताना नागपूर जिल्ह्यात सरकारी शाळांची परिस्थिती अतिशय खराब आहे. त्यामुळे या शाळांना विद्यार्थी मिळत नाहीत.