महिनाभर खंड पडलेल्या पावसाला बुधवारपासून औरंगाबादमध्ये रिपरिप सुरुवात झाली. गुरुवार आणि शुक्रवार रोजी पावसाचा जोर वाढल्याने सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड,भराडी,अंभई, अजिंठा,गोळेगाव (बु.), आमठाना,निल्लोड,बोरगाव बाजार या आठही मंडळात चांगला पाऊस झाला.
खेळणा धरणात आवक सुरू
पावसाने काही प्रमाणात तग धरलेल्या सोयाबीन,मका,कापूस,तुर अशा पिकांना जीवदान मिळाले. या पावसामुळे बळीराजा आनंदीत झाला असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यातील शेखपुर जांभई, अंभई, केळगाव,मुर्डेश्वर या भागात पावसाचा जोर चांगला असल्याने के नदीतून खेळणा धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.
48 तासात पावसाची तीव्रता वाढेल
राज्यात पुढचे 2 दिवस पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे.
होरपळलेली भातशेती हिरवीगार
कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये दमदार पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. पावसामुळे होरपळलेली भातशेती हिरवीगार झाली असून शिवारात पाणी साचले आहे. उन्हाच्या कडाक्यात भात करपून जाण्याच्या भीतीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या आधी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस पडला होता. त्या नंतर पावसाने आतापर्यंत डोळे उघडले होते. आता पुन्हा पावसाने जोरदार आगमन केले आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर
अहमदनगर, पुणे, नाशिक भागांत पावसाच्या अनेक ठिकाणी जोरदार सरी पडल्या. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत हलक्या सरी बरसल्या तर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडला. खानदेशात पावसाने चांगली हजेरी लावली.
मराठवाड्यातही सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम होता. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक होता. तीन जिल्ह्यांतील 9 मंडळांत अतिवृष्टी झाली. नांदेड, लातूर, धाराशीव, बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागात पाऊस पडला. परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस, सोयाबीन, तूर उत्पादकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत सर्वत्र पाऊस झाला. तर अकोला जिल्ह्यातही काही भागात पावसाने हजेरी लावली.