नागपुरातील सीताबर्डी परिसरामधील गोवारी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. जवळपास १२ ते १५ वाहने एकमेकांवर धडकली. या अपघात दोन जण जखमी झाले असून वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.वाहतूक पोलीस आणि सीताबर्डी पोलिसांनी पुलावर पोहचून अपघातग्रस्तांना मदत केली. वाहतूक बंद करुन रस्ता मोकळा केला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वामन बापूराव नेवारे (४५, मटकाझरी) हे मंगळवारी सकाळी कारने उमरेडला जात होते.बर्डीच्या गोवारी उड्डाणपुलावरुन जात जात असताना समोरील कारने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे मागे असलेल्या वामन नेवारे यांची कार पुढील वाहनावर आदळली व आडवी झाल्यामुळे मागून येणारी दुसरी कार नेवारेंच्या कारवर धडकली. त्यानंतर उड्डाणपुलावरुन सुसाट जाणारी वाहने एकमेकांवर धडकायला लागली. काही सेकंदातच उड्डाणपुलावरील जवळपास १२ ते १५ वाहने एकमेकांवर धडकल्या. यामध्ये काही ऑटो, कार, आयशर ट्रक आणि एका स्कूलव्हँनचा समावेश आहे.
या विचित्र अपघातामुळे उड्डाणपुलावरुन जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातात नेवारे यांच्यासह राजेश शेंडे (चिमुरकर लेआऊट, हुडकेश्वर) हेसुद्धा किरकोळ जखमी झाले. काही मिनिटातच उड्डाणपुलावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. सीताबर्डी पोलीस आणि वाहतूक पोलिसांचे पथक काही मिनिटातच उड्डाणपुलावर आले. त्यांनी अपघातग्रस्त वाहनांना एका बाजूला करण्याचा प्रयत्न केला. गाड्या एकमेकांवर धडकल्यामुळे काही वाहनचालकांमध्ये वाद सुरु होते. चालकांशी संवाद साधून त्यांची समजूत घातली. शेवटी या अपघाताची नोंद सीताबर्डी पोलीस ठाण्यात करण्यात आली.
समाजमाध्यमावर ‘व्हिडिओ व्हायरल’
गोवारी उड्डाणपुलावर विचित्र अपघात झाल्यानंतर काही कारचालकांनी रस्त्यावर उतरुन वाद घालणे सुरु केले. तर काहींनी मोबाईलने व्हिडीओ काढले. ते अनेक समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. या अपघातातील वाहनांची स्थिती बघता गंभीर स्वरुपाचा अपघात असल्याचे दिसत आहे. मात्र, या अपघातात दोन कारचालक किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन तास वाहतूक ठप्प
रहाटे कॉलनी चौक ते थेट झिरो माईल चौकात पोहचण्यासाठी गोवारी उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. मात्र, कार एकमेकांवर धडकल्याने झालेल्या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाली होती. त्यामुळे उड्डाणपुलाखालील मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती. जनता चौक, पंचशील चौक आणि व्हेरायची चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे दोन पथके उड्डाणपुलाखाली तैनात करण्यात आली होते.