जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांची नागपुरात माहिती
नागपूर | राज्यात पालकमंत्री पदाचा वाद सुरू असताना आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री पद मिळाले होते, असे स्पष्टीकरण जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे
नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “गेल्यावेळी स्वच्छ आणि सुंदर कुंभमेळा आम्ही आयोजित केला होता. यावेळी अपेक्षेपेक्षा दुप्पट भाविक येणार आहेत. त्यामुळे मी पालकमंत्री राहिल्यास व्यवस्थापन अधिक सुकर होईल, अशी आमची भूमिका आहे.”
नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांसाठी महायुतीतील तीनही पक्षांकडून पालकमंत्रिपदासाठी मागणी आहे. “यापूर्वी माझी नियुक्ती जाहीर झाली होती, मात्र नंतर मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही जागांवर स्थगिती दिली. सध्या तीनही पक्षांचे नेते चर्चेत असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल,” असे महाजन यांनी सांगितले.
गोसेखुर्द प्रकल्पावर बोलताना महाजन यांनी सांगितले की “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपत्ती विभागाचे मंत्री असताना या प्रकल्पासाठी ₹२०,००० कोटींची प्रशासकीय मान्यता दिली होती. येत्या दीड-दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल.”