यंदाच्या पावसाळ्यात द्राक्ष उत्पादक पट्ट्यात सतत पाऊस पडत राहिला. अनेकदा अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे द्राक्ष उत्पादनात सुमारे ६० टक्क्याने घट होण्याचा अंदाज आहे. वाईनसाठीच्या द्राक्ष उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील एकूण वाईन उत्पादनात एक कोटी लिटरने घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर्स असोसिएशनने दिली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. द्राक्ष उत्पादक नाशिक, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांतही सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. अनेकदा अतिवृष्टीचा, महापुराचा सामना करावा लागला. सततच्या पावसामुळे द्राक्ष वेलीच्या काड्यांमध्ये सुक्ष्म घड निर्मिती झाली नाही. त्यामुळे उत्पादनात ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे.
राज्यात वाईनसाठी वेगळ्या प्रजातींच्या द्राक्षांची लागवड होते. ही लागवड दहा हजार हेक्टरपर्यंत गेली होती, ती सहा हजार हेक्टरपर्यंत खाली आहे. त्यामुळे उच्च दर्जाच्या वाईन उत्पादनावरही परिणाम होणार आहे. खास वाईनसाठीच्या द्राक्षांपासून उच्च दर्जाची सुमारे दीड कोटी लिटर वाईन तयार होते, त्यात ५० हजार लिटरने घट होऊन उच्च दर्जाची वाईन एक कोटी लिटरपर्यंत उत्पादीत होईल.
खाण्यासाठीच्या द्राक्षांपासूनही वाईन तयार केली जाते. द्राक्षबागेतील द्राक्षांची बाजारात विक्री झाल्यानंतर बागेत शिल्लक राहिलेल्या कमी प्रतीच्या द्राक्षांपासून सुमारे दीड कोटी लिटर वाईन निर्मिती होते. यंदा उत्पादनात होणारी घट, बाजारातील मागणी आणि बेदाणा निर्मितीसाठीची मागणी विचारात घेता वाईनसाठी द्राक्षांची उपलब्धता कमी राहील. वाईन उद्योगाकडून २० ते २५ रुपये किलो दराने द्राक्ष खरेदी होत होती. यंदा ४० ते ५० रुपये देऊनही वाईनसाठी द्राक्षे मिळणे कठीण आहे, परिणाम ५० हजार लिटरने घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकूण वाईन निर्मिती तीन कोटी लिटरवरून दोन कोटी लिटरपर्यंत खाली येईल, असा अंदाज ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी व्यक्त केला आहे.
युरोपीयन देशांतून मोठी मागणी
राज्यात सुमारे तीन कोटी लिटर वाईन निर्मिती होते. वाईनसाठीच्या द्राक्ष क्षेत्रात झालेली घट आणि खाण्याच्या द्राक्ष उत्पादनात होणारी संभाव्य घट पाहता एकूण वाईन निर्मितीत एक कोटी लिटरने घट होण्याचा अंदाज आहे. मागील वाईन शिल्लक असल्यामुळे सप्टेंबर २०२६ पर्यंत वाईनचा तुटवडा भासण्याची शक्यता नाही. पण, वाईनच्या दरात वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्यातून २५ हून जास्त देशांना वाईन निर्यात होते, अशी माहिती ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी दिली.
विश्वभारत News Website