वरील विषयाच्या अनुषंगाने आदरणीय, श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री( महाराष्ट्र राज्य ) आपणास या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की,मागील अनेक वर्षापासून स्वीकृत सदस्य म्हणून त्या-त्या पक्षातील राजकीय लोकांना विशेष स्थान दिल्या जाते.परंतु बदलत्या काळानुसार स्वीकृत सदस्य पदाचे निकष बदलविने गरजेचे आहे.सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा सोबतच महायुतीला महानगरपालिका निवडणुकीमध्ये भरघोस यश प्राप्त झाले आणि २९ पैकी २५ मनपामध्ये जनतेचा कौल महायुतीकडे आला व महायुतीची सत्ता आली आहे याबद्दल आपले,भाजपाचे व महायुतीचे हार्दिक अभिनंदन.या सर्वच महापालिकेमध्ये १५ नगरसेवकांच्या मागे १ नगरसेवक अशा पध्दतीने स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे याचेही मनापासून स्वागत.स्वीकृत नगरसेवक निवडण्याचा अधिकार त्यांच्या संख्याबळाप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्षांना आहे. आतापर्यंत स्वीकृत नगरसेवक हा राजकीय पातळीवरील असायचा.परंतु सरकारने स्वीकृत नगरसेवक पदाचे निकष बदलवून राजकीय पातळीवर न देता सामाजिक पातळीवर द्यायला हवे असे मला वाटते.प्रत्येक महानगरपालिकेच्या अंतर्गत सामाजिक कार्यशैलीला कुठेतरी मानाचे स्थान असणे गरजेचे आहे. सामाजिक कार्य करणारे निष्ठावंत,विचारवंत व समाजासाठी झटणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील समाजसेवक सुद्धा असतात आणि आहेत त्यांचे कार्य अफाट असते परंतु दिसत नाही,ही बाब सरकारने व राजकीय पक्षांनी लक्षात घेतली पाहिजे.सोबतच प्रत्येक पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे.यात प्रामुख्याने पत्रकार, लेखक, साहित्यिक, स्वतंत्र पत्रकार, विचारवंत,पर्यावरण प्रेमी,निवृत्त अग्निशमन अधिकारी, सैन्यदलातील निवृत्त अधिकारी, निसर्ग प्रेमी इत्यादी अशा अनेक प्रकारच्या सतत सामाजिक कार्यासाठी झटणाऱ्यांना स्वीकृत सदस्यपदी स्थान मिळायला हवे. कारण राजकारणाच्या ठिकाणी राजकारण ठीक आहे. परंतु सामाजिक कार्याला नवी चालना देण्याच्या उद्देशाने सरकारने व पक्ष-विपक्षांनी अशा पध्दतीचे पाऊल उचलले पाहिजे. कारण स्वीकृत सदस्य हा पर्याय सरकार जवळ असल्याने याला राजकारणात गुरफटने योग्य नाही. यावर सरकारने, सन्माननीय राज्यपाल,सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्याने विचार करून सामाजिक कार्याला नवीन दिशा देण्याच्या उद्देशाने पाऊल उचलणे गरजेचे आहे.आज पत्रकार, लेखक आपल्या लेखणीच्या माध्यमातून गल्लीपासून तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतची माहिती प्रत्येकांच्या घरोघरी पोहचविण्याचे कार्य करीत असतो. अशांना सरकारने स्वीकृत नगरसेवकांची जबाबदारी दिली तर सामाजिक कार्याला मोठी मदत होईल. राजकीय पुढारी हा आपल्या पद्धतीने कार्य करेलच यात दुमत नाही.परंतु सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक हे आपले कार्य आगळ्यावेगळ्या पद्धतीने करून नवीन विकासाचे पाऊल उभे करू शकते व नवीन ऊर्जा निर्माण करू शकते. कारण सामाजिक कार्याची जाणीव व दांडगा अनुभव यांना पुर्वीपासूनच असतो फक्त साथ हवी सरकारची,राजकीय पक्षांची व पुढाऱ्यांची.त्यामुळे सरकारने राजकीय ताळमेळासोबतच सामाजिक कार्याची बांधिलकी जपणाऱ्यांना जर सरकारने स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती केली तर शहराच्या विकास आणखी भरभराटीला येईल.सरकारला व सन्माननीय मुख्यमंत्री यांना माझी नम्र विनंती आहे की स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करायला हवा.कारण राज्यातील महापालिकांमध्ये जर सामाजिक कार्यातील व्यक्ती सहभागी झाली तर राज्यातील चित्र आगळेवेगळे दिसून येईल. कारण यामध्ये येणारे स्वीकृत नगरसेवक वेगवेगळ्या क्षेत्रातील असल्याने वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून मनपामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्याचे काम करतील.कारण त्यांचा अनुभव व अभ्यास शहराच्या विकासासाठी हातभार अवश्य लावेल. स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती सामाजिक पातळीवर केली तर राज्याचे नाव देशामध्ये सुवर्ण अक्षरात कोरले जाईल.यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी,सरकारनी व माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एकमत करून ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे. जेणेकरून सामाजिक कार्याला नवीन चालना मिळेल.जय हिंद.जय महाराष्ट्र.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार,
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर) (चौथास्तंभ पुरस्कृत मुक्त पत्रकार-२०१९)
६३ बी शिवनगर, नागपूर -९
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
मेल आयडी:- lanjewar767@gmail.com
विश्वभारत News Website