मूल- नदी काठावर बांधलेल्या नळ योजनेच्या विहिरीचे छत कोसळल्याने पुंडलिक मराठे नामक मजुराचा विहिरीत पडून मृत्यू झाला ही घटना तालुक्यातील केळझर येथे बुधवार, 12 मे रोजी सकाळी घडली. मूल तालुक्यातील केळझर येथेे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने 1980-81 मध्ये गावापासून अडीच किलोमिटर अंतरावरील अंधारी नदीवर 50 फुट खोल विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते. नळ योजनेकरिता बांधण्यात ही आलेली विहिर आणि त्यावरील छत जीर्ण झाले होते. त्याची कालमर्यादा जवळपास 35 वर्षे पर्यंत असते आणि ही कालमर्यादा पूर्ण झाली होती. त्यानंतर जिर्णावस्थेत आलेल्या या विहिरीचे आणि त्यावरील छताचे मजबुतीकरण करणे किंवा नव्याने विहिरीचे बांधकाम करण्याची जबाबदारी ही ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि संबंधित ग्राम पंचायतीची होती.
क्षतीग्रस्त झालेली केळझर येथील विहिर बांधकाम नियमानुसार पाच ते सहा वर्षापूर्वीच निर्लेखनास पात्र होती. त्यामुळे पाणी पुरवठा विभाग आणि ग्राम पंचायतीने ही विहिर बंद करून अथवा त्यावरील जीर्ण छताचे मजबुतीकरण करावयास पाहिजे होते. पण ग्राम पंचायतीने विहिरीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मजुराला आपला जीव गमवावा लागला. नादुरूस्त मोटारपंप दुरूस्त करून मृतक पुंडलिक मराठे हे मिस्त्री रमेश मंडल व अन्य सहकार्यांसह बुधवारी विहिरीवर गेले. मोटारपंप लावत असताना अचानक विहिरीचे छत कोसळले. त्यामुळे स्लॅबवर उभे असलेले पुंडलिक मराठे 50 फुट खोल विहिरीत पडले. घटनेची माहिती होताच सरपंच काजू खोब्रागडे आणि ग्राम पंचायत सदस्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. प्रभारी तहसिलार यशवंत पवार, संवर्ग विकास अधिकारी डॉ. मयुर कळसे आणि ठाणेदार सतिशसिंह राजपुत घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी मृतकाच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई देण्याची मागणी रेटून धरली. ग्राम पंचायतीने मृतकाच्या पत्नीला 1 लाखाची आर्थिक मदत आणि पद रिक्त झाल्यानंतर ग्राम पंचायत सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले.
नळ योजनेच्या विहिरीचे छत कोसळल्याने मजुराचा मृत्यू
Advertisements
Advertisements
Advertisements