शाळांनी साहित्य विक्रिचा गोरखधंदा बंद करावा
– विदर्भ पालक संघटनेची मागणी
नागपूर,
शाळांनी विद्यार्थ्यांना पुस्तक, वही आणि इतर शालेय साहित्य विकण्याचा जो गोरखधंदा सुरू केला आहे तो तत्काळ बंद करावा अशी मागणी विदर्भ पालक संघटनेचे अध्यक्ष संदीप अग्रवाल यांनी केली आहे.
एका प्रसिद्धी पत्रकात अग्रवाल म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी शाळांद्वारे शालेय पुस्तके आणि साहित्यांच्या नावावर पालकांकडून कोट्यवधी रुपयांची लूट करीत आहेत. कोणत्याही शाळेने पुस्तक, वही, कपडे, बूट व इतर साहित्य विक्री करू नये असे शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश आहेत. त्या त्यानंतरही शाळांद्वारे शालेय साहित्य विक्रीचा गोरखधंदा सर्रास सुरू आहे आणि शिक्षण विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
यावर्षी शहरातील नामांकित शाळा शालेय साहित्य विक्रीसाठी कुरीअर सेवेची नवीन शक्कल लढवीत आहे. तसेच याबाबत पालकांना पाठविण्यात येणार्या निवेदनामध्येही त्याचा उल्लेख करीत आहेत. काही निवडक पुस्तक प्रकाशक आणि शाळांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असून याद्वारे मोठ्या प्रमाणात कमिशनही लाटले जात आहे. अशा शाळांचा गोरखधंदा तत्काळ बंद करावा असा इशारा अग्रवाल यांनी दिला आहे. तसेच शहरातील सर्व शाळांमध्ये एनसीआरटीचा पाठ्यक्रम लागू करण्यात यावा अशी ही मागणी या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.