विश्व भारत ऑनलाईन :
नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्वर, सावनेर तालुक्यातील संत्रा व मोसंबी बागेत सध्यस्थितीत काळया माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. विदर्भातील हवामान या किडीच्या वाढीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे बागांचा ऱ्हास होत असल्याची माहीती प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वंडली येथील कीटकनाशक तज्ज्ञ प्रा.प्रवीण दरणे यांनी दिली. माशीमुळे फळाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. काटोल व नरखेड तालुक्यात मागील आठवडयात झालेल्या सर्व्हेक्षणात मोसंबी पिकावर सोनोली, मेंडकी, खुटांबा, गोंडीदिग्रस, भरतवाडा, झिलपा, कोलुभोरगड, मासोद, धुरखेडा, खैरी, शिरमी, सावरगांव, नरखेड, जलालखेडा, भिष्णूर, मोवाड, मेंढला, कळमेश्वर तालुक्यातील मोहगांव, सुसूंद्री, मांडवी, खुमारी, पारडी, कळमेश्वर, पिलकापार, सावली बुद्रुक, गुमथळा, सावनेर तालुका, कारंजा (वर्धा) वरुड मोर्शी (अमरावती) भागात मोसंबी व संत्रावर काळया माशीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढलेला तज्ज्ञांना दिसला.
शेतकऱ्यांना द्या मदत
माशीच्या अंडयातून पिल्ले बाहेर पडून पानावर व फळांवर स्त्राव सोडल्यामुळे बुरशी आद्रतेमुळे वाढून पानातील व फळातील अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया बाधीत झाली आहे. फळातील रस बेचव होऊन फळाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे.तर संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्यावी,अशी मागणी कोंढाळी येथील संत्रा उत्पादक तौसिफ पठाण यांनी केली आहे.