नागपूरच्या सावनेर तालुक्यातील परिसरातल्या 18 बोगस कामगारांच्या नावानं कामगार कल्याण मंडळाने निधी वाटप केल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे एका मृत व्यक्तीच्या नावानं तब्बल 2 लाख 34 हजार रुपये लाटण्यात आले. कामगाराला जर या मंडळाशी संबधित कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या कामगाराची मंडळाकडे नोंदणी असणं बंधनकारक आहे. मात्र ज्या कामगारांना लाभ देण्यात आले आहेत, त्यातील एकही कामगार नोंदणीकृत नसल्याचं हाती लागलेल्या गोपनीय अहवालातून उघड झालं आहे. या घोटाळ्याचं बिंग फुटलंय. या घोटाळ्याविरोधात सावनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आलाय.
मात्र एकाही अधिकाऱ्याला या संपूर्ण प्रक्रियेत संशय कसा आला नाही?यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तुम्ही आम्ही राहत असलेल्या छोट्या, मोठ्या आणि गगनचुंबी इमारती उभारण्यासाठी जे हात झिजतात आणि ज्यांचा घाम गळतो त्या बांधकाम कामगारांचं भवितव्य मात्र अंधातरी असतं. बांधकाम सुरू असताना अघटित घटानांमध्ये त्यांना कधी अपंगत्व येतं तर कधी जीवाला मुकावं लागतं. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबाला तात्पुरता का होईना आर्थिक आधार मिळावा यासाठी कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र कामगारांच्या कल्याणापेक्षा दलालांना हाताशी धरून या खात्यातल्या अधिकाऱ्यांचंच कल्याण होत असल्याचा धक्कादायक गोपनीय अहवाल हाती लागलाय. याविरोधात लवकरच न्यायालयात दाद मागू, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी दिली आहे.