राज्यात काँग्रेसचे विविध जिल्ह्यांमध्ये अनेक मातब्बर नेते आहेत. त्यामुळे नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करताना पक्षनेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागेल. प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत असणाऱ्या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, सुनिल केदार, यशोमती ठाकूर यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र,या स्पर्धेत सध्या तरी अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभेच्या आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर या सगळ्यात पुढे असल्याचे समजते.
स्थानिक राजकारणावर पकड आणि प्रदेश पातळीवरील कामाचा अनुभव या यशोमती ठाकूर यांच्या जमेच्या बाजू आहेत. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत काँग्रेसचा विजयी झेंडा फडकवला होता.
नवे प्रभारी मिळणार?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राज्य आणि केंद्रीय पातळीवरील नेत्यांमध्ये समन्वय राखण्याच्या दृष्टीने राज्य प्रभारीपदाचं महत्वही वाढलं आहे. अशातच काँग्रेसचे सध्याचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हे आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता आहे. कारण कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पाटील हे आमदार म्हणून निवडून आले असून त्यांचा राज्य मंत्रिमंडळातही समावेश केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केरळमधील रमेश चेन्निथला यांची महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून निवड होऊ शकते, अशी शक्यता आहे.
विश्वभारत News Website