राज्याच्या वन विभागात झालेल्या बदल्यांबाबत भाजपच्याच 4 आमदारांनी तक्रार केल्यानंतर त्या बदल्या थांबविण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या सचिवांनी या बदल्या होऊ शकत नाहीत, सदर बदलीस ते अधिकारी पात्र नाहीत, असा शेरा मारला असतानाही पदोन्नती केल्या गेल्या. तर उत्पादन शुल्क विभागात वर्ग 3 व वर्ग 4चे अधिकार सचिवांकडे असताना मंत्र्यांनी बदल्या केल्या आहेत, असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी करत बदल्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराबाबत सरकारवर ताशेरे ओढले.
पैसे द्या… पोस्टिंग मिळवा
सरकारी बदल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. जो अधिकारी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देईल, गैरव्यवहार करेल त्याला हवे त्या ठिकाणी पोस्टिंग मिळते व जे मंत्र्यांच्या मनाविरुद्ध काम करेल त्यांना पद्धतशीरपणे बाजूला केले जात असल्याचे अंबादास दानवे म्हणाले.
बदल्यांच्या फाईल शिल्लक
दरवर्षी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्याच्या बदल्या एप्रिल- मे महिन्यापर्यंतच केल्या जातात. पण या वर्षी बदल्यांना जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच निवासी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी अशा पदांच्या बदल्यांचे आदेश महसूल विभागाने जारी केले. जून महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात आखणीन मोठ्या प्रमाणावर बदल्या होण्याची शक्यता आहे. तर महसूलचे सहसचिव माधव वीर यांचे बदल्यांचे कारनामे अजूनही सुरूच असल्याचे दिसते. मनमानी कारभार करून वीर यांनी मोठी माया जमविली, असा आरोप केला जात आहे.
विश्वभारत News Website