‘पशुसंवर्धन विभाग हा थेट शेतकर्यांशी संबंधित आहे.शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्या, योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यास अनेक जिल्हे मागे असून, ही स्थिती 31 ऑक्टोबरअखेर बदला; अन्यथा कारवाईला सामोरे जा,’ अशा शब्दांत कामचुकार अधिकार्यांची पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास सचिव तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी खरडपट्टी काढली. औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयात मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाची राज्यस्तरीय जम्बो आढावा बैठक पार पडली. सकाळी सुरू झालेली ही बैठक रात्री साडेआठ वाजेपर्यंत चालली. त्यामध्ये विविध तांत्रिक मुद्दे, विभागांच्या योजना, शेतकर्यांना येणारे प्रश्न, तेथील कार्यालयांच्या कामकाजातील उणिवा, संबंधित अधिकार्यांची टीम वर्क म्हणून असलेली सांघिक कामगिरी यावर त्यांनी प्राधान्याने भर दिला.
जिल्हा योजनांची अंमलबजावणी आणि शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यात कमी पडणार्या अधिकार्यांना मुंढे यांनी चांगलेच फैलावर घेतल्याची माहिती सूत्रांनी बैठकीनंतर दिली. ‘लम्पी त्वचा रोगाची लस तुमच्या जिल्ह्यात वेळेवर पोहोचूनही जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी का होत नाही? या गंभीर परिस्थितीचे उत्तर देण्यास आपणच जबाबदार आहात,’ अशा शब्दांत त्यांनी अधिकार्यांची झाडाझाडती घेतली.
‘क्षेत्रीय स्तरावर आपण कसेही वागलो आणि शेतकर्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक केली म्हणजे याचा जाब आपल्याला कोणी विचारणारे नाही? या भ्रमात राहू नका. तुमच्यावर कारवाई करायला मला फारसा वेळ लागणार नाही.
विश्वभारत News Website