मार्चमध्ये थंडी कमी होऊन उकाडा जाणवू लागलाय. अशा स्थितीत अपेक्षेच्या विरुद्ध मुंबईच्या किमान तापमानात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आता थंडी हळूहळू गायब होताना दिसत असून राज्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात वाढ होताना दिसणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यावेळी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या पावसामुळे सर्वात जास्त नुकसान झाल्याचं दिसून आलं. वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशासह राज्याच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानात बदल होत असून आता रात्री थंडी, दिवसा उन्हाचा उकाडा जाणवण्यास सुरूवात झालीये.
पुणे हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आलाय. यावेळी शहर आणि उपनगरात प्रामुख्याने आकाश निरभ्र राहणार आहे.
१२ आणि १३ मार्चला पंजाबमध्ये तर १३ मार्चला हरियाणा, राजधानी दिल्लीसह पश्चिमी उत्तर प्रदेशात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय या चार दिवसांच्या कालावधीत जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बलुचिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश या राज्यांत देखील पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र पश्चिमी वाऱ्याचा कोणताही परिणाम होणार नसून पाऊस आणि गारपिटीची शक्यता नाही. मात्र, उत्तरेकडील राज्यात ती परिस्थती असल्यामुळे पहाटे गारवा वाढू शकतो, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.