दीड दशक नागपूर महापालिकेवर सत्ता असलेल्या भाजपकडून सलग चौथ्यांदा विजय मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, उमेदवारी इच्छुकांची प्रचंड संख्या आणि अंतर्गत नाराजी यामुळे पक्षाला संभाव्य बंडखोरीची भीती सतावत आहे. ही बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची अंतिम यादी अगदी शेवटच्या क्षणी जाहीर करून बी फॉर्म वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सध्या इच्छुक उमेदवार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.
तब्बल नऊ वर्षांनंतर नागपूर महापालिकेची निवडणूक होत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाली असून भाजपकडे इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. दीर्घकाळ सत्तेत असल्यामुळे प्रत्येक प्रभागात भाजपकडून अनेक दावेदार पुढे आले आहेत. चार सदस्यीय प्रभागांमध्ये चार जागांसाठी तब्बल आठ ते दहा इच्छुकांनी उमेदवारीचे दावे ठोकले आहेत.
विशेष म्हणजे या दावेदारांमध्ये अनेक अनुभवी, निवडणुका जिंकण्याचा ‘मेरिट’ असलेले चेहरे आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना कोणाला संधी द्यायची, हा मोठा प्रश्न पक्ष नेतृत्वापुढे उभा ठाकला आहे. त्याचवेळी काही ठिकाणी ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षांतर्गत सूर असल्याने जुने आणि नवे यांचा समतोल साधणे हेही मोठे आव्हान आहे.
१५१ जागांच्या नागपूर महापालिकेसाठी भाजपकडे सुमारे १७०० ते १८०० इच्छुकांनी मुलाखती दिल्याची माहिती आहे. एवढ्या मोठ्या संख्येमुळे नाराजी आणि बंडखोरीचा धोका वाढला आहे. हा धोका लक्षात घेऊनच अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत उमेदवारांची यादी जाहीर करून बी फॉर्म वाटप करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
आभाळात उडालेला दगड महिलेच्या पायावर कोसळला
डिनर डिप्लोमसीचा प्रयोग
संभाव्य नाराजी कमी करण्यासाठी भाजपकडून ‘डिनर डिप्लोमसी’चा मार्ग अवलंबला जाणार आहे. मुलाखती दिलेल्या सर्व इच्छुकांना एकत्र आणून गेट-टुगेदर आयोजित करण्याची तयारी आहे. यामागे बंडखोरी टाळणे, तसेच पक्षाने यापूर्वी राबवलेल्या ‘घर चलो’ अभियानात सर्वांना सहभागी करून घेण्याचा उद्देश आहे. बंडखोरी करू शकणाऱ्या नेत्यांची आधीच ओळख पटवून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही समजते. एकूणच या सगळ्या हालचालींमुळे भाजपमधील उमेदवारांना सध्या केवळ प्रतिक्षाच करावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
विश्वभारत News Website