औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र डिझेल न मिळण्याचे कारण नसून वाहन चालक उपलब्ध नव्हता असे कारण रुग्णालय प्रशासनाकडून दिले जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील नालेगाव येथील सात महिन्याच्या गरोदर मनिषा इंगळे यांना प्रसुती वेदना हाेत असताना पाच किलोमीटर दुचाकीवरुन प्रवास करावा लागला. परिणामी त्यांचे नवजात मूल दगावले. हिंगोलीतील या घटनेमुळे आरोग्य व्यवस्था आणि दळणवळणातील इंधन तुटवड्याची भिषणता समोर आली आहे.
नालेगाव येथील मनिषा इंगळे या सात महिन्यांच्या गरोदर होत्या. मंगळवारी अचानक त्यांना तीव्र पोटदुखी सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना दुचाकीवरून जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.
प्रसुती वेदना सुरू असताना पाच किलोमीटरचा दुचाकीवरुन करावा लागला. प्राथमिक तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा सल्ला दिला. यानंतर कुटुंबीयांनी १०२ आणि १०८ क्रमांकावर वारंवार संपर्क साधूनही तातडीची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. वेळ न दवडता खासगी रुग्णवाहिकेच्या मदतीने महिलेला हिंगोली येथे हलविण्यात आले. मात्र तेथे सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर नवजात बालक मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी “वेळेवर रुग्णवाहिका मिळाली असती तर बाळाचा जीव वाचला असता,” असा आरोप करत आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे. दुसरीकडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी “रुग्णवाहिकेत डिझेल होते, मात्र चालक नव्हता. तसेच महिलेच्या गर्भाशयात अतिरिक्त पाणी साचल्याने गुंतागुंत निर्माण झाली होती,” असे स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या अनुषंगाने जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
विश्वभारत News Website