Breaking News

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तीन गावांचे पुनर्वसन होणार – मुख्यमंत्र्यांनी मागितला प्रस्ताव

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तीन गावांचे पुनर्वसन होणार
– मुख्यमंत्र्यांनी मागितला प्रस्ताव
मुंबई,
वन्यजीवांचा अधिवास सुधारण्याच्या दृष्टीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानतळोधी व कोळसा तसेच प्रकल्पाच्या बाहेरील वन्यजीव अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा कारवा गावाचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

अलिकडील काळात राज्यात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, राज्यात सध्या 312 वाघ आहेत. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या जास्त आहे. त्या भागात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. या पृष्ठभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत वनविभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. राज्यातील वाघांची संख्या आणखी वाढणार हे गृहित धरून आतापासूनच त्यावर मार्ग काढणे, उपाययोजना करणे गरजेचे आहे, तरच पुढील काळात आपण हा संघर्ष टाळू शकतो. त्यासाठी व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्यांच्या जवळच्या गावांचे आवश्यकतेनुसार पुनर्वसन करण्यात यावे. शक्यतो गावकर्‍यांना रोखीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

नैसर्गिक स्थळांचा विकास करावा
पर्यटकांना आकर्षित करू शकतील अशीच ठिकाणी निवडून त्यामध्ये नैसर्गिकरीत्या वाढतील व दिसतील अशा स्थळांचा विकास करावा तसेच तेथे जंगलाचा अनुभव आला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना करा
उघड्या विहिरीत वाघ तसेच अन्य प्राणी पडून त्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना अलिकडील काळात घडल्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी त्या भागातील विहिरींना संरक्षण भिंत बांधणे व अन्य उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील संरक्षित क्षेत्र व वन्यजीव व्यवस्थापन, व्याघ्र संवर्धन, राज्यातील अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांचा विकास, कांदळवन संरक्षण व उपजीविका योजना, पावसाळ्यातील वृक्ष लागवड, हवाई बीज पेरणी, सामाजिक वनीकरण, पर्यायी वनीकरण निधी, व्यवस्थापन प्राधिकरण आदी कामांचा आढावा घेतला. वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी विभागाच्या कामांचे सादरीकरण केले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. तसेच अलिकडील काळात नव्याने घोषित झालेल्या तीन संवर्धन राखीव क्षेत्रांची अधिसूचना येणे बाकी आहे. त्याचा पाठपुरावा करावा व अधिसूचना काढावी. विहिरीत पडून होणारे वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जर्‍हाड इत्यादी मान्यवर बैठकीसाठी उपस्थित होते.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *