विश्व भारत ऑनलाईन :
प्रवासदर्जा उंचावण्यासाठी एसटी महामंडळाने सीमोल्लंघन करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळ नफ्यात आणण्याकरीता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘एसटी पुनरुज्जीवन आराखड्या’ची अंमलबजावणी सुरू केलीय. खर्च कमी करण्यासाठी भाडेतत्त्वावरील गाड्यांवर भर आणि डिझेलवरील अवलंबित्व संपवण्यासाठी विद्युत, सीएनजी गाड्यांचा यात समावेश आहे. चार वर्षांत टप्याटप्याने सात हजार गाड्या घेत एसटी ताफा २२ हजारापार नेण्याचे महामंडळाने नियोजन केले आहे.
असे नियोजन
राज्यात एसटी सेवा सुरू ठेवण्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पीय अंदाज २०२१-२२ नुसार महामंडळाचा संचित तोटा १०,४०७ कोटी रुपये इतका आहे. हा तोटा कमी करण्यासाठी ‘एसटी’ने पुनरुज्जीवन आराखडा तयार केला आहे. पाच वर्षे शून्य नोकरभरती, दरवर्षी भाडे आढावा, उत्पन्नवाढीसाठी प्रवासी वाहतुकीशिवाय अन्य पर्यायांवर भर या निर्णयांचा आराखड्यात समावेश असणार आहे. या निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यानंतर २०२६-२७ अखेर एसटीवर ‘शून्य कर्ज’ असेल. या आराखड्यानुसार ३६ कोटी रुपयांचा नफा निश्चित करण्यात आला आहे.