छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगाचे आदर्श आहेत, असे वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवप्रेमींच्या टीकेचे धनी ठरत आहेत. त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून सडकून टीका केली जात आहे. त्यांच्या या विधानावर भाजपचे महाराष्ट्रातील बडे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या विधानाला थेट घरचा आहेर दिला.
फडणवीस काय म्हणाले?
“मला वाटत नाही की, राज्यपालांच्या मनातही काही शंका आहे. त्यामुळे राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ निश्चित काढण्यात आले आहेत. पण राज्यपालांच्यादेखील मनात असे कुठलेही भाव नाहीयत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस ठणकावून सांगितलं.
यावेळी भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीसांनी आपण त्रिवेदी यांचं वक्तव्य नीट ऐकलेलं आहे. यामध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीने महाराजांनी माफी मागितलीय, असं म्हटलेलं नाही, अशी भूमिका मांडली आहे.