200 मीटर लांबीचे हे बॅरिअर सध्या वणी ते वरोरा महामार्गावर लावण्यात आले आहे. या बॅरिअरचे नाव ‘बाहुबली’ ठेवण्यात आले असून, राष्ट्रीय वाहन चाचणी ट्रॅकसह पिथमपूर, इंदूर आणि इतर काही ठिकाणी याच्या चाचण्या घेण्यात आल्या. रूरकीच्या केंद्रीय इमारत संशोधन संस्थेत याची अग्निरोधक चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांनंतर भारतीय रोड काँग्रेसने याला मान्यता दिली आहे.
अपघात होऊ नये म्हणून महामार्गाच्या कडेला लावण्यात येणार्या धातूच्या कठड्यांऐवजी बांबूचे क्रॅश बॅरिअर लावण्याचा जगातील पहिला प्रयोग विदर्भात करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. गडकरी यांनी एक ट्विट करीत या बांबू क्रॅश बॅरिअरची छायाचित्रासह माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘आत्मनिर्भर भारत’ होण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकत जगातील पहिले पूर्णपणे बांबूपासून बनवलेले क्रॅश बॅरिअर विकसित करण्यात आले आहे.