अलीकडेच डॉक्टर गौरकार दांपत्यांचे अपघातात निधन झाले. भरधाव ट्रकने वणीकडे येत असलेल्या कारला धडक दिल्याने डॉक्टर दांपत्यांचा जागीच मृत्यू झाला. पण, अपघात झाला तेव्हा तेथे बघ्याची गर्दी झाली होती. कुणी व्हिडीओ काढण्यात व्यस्त, तर कुणी फोटो काढण्यात गुंग होता. सामाजिक जाणीवेचे भान हरपून गर्दी निव्वळ व्हिडीओ आणि फोटोत व्यस्त होते. इतकी कशी बेपरवाई? एखादाचा जीव जातोय आणि त्याला मदत करण्याऐवजी फोटोसेशन का? असा सवाल उपस्थित होत आहे.
डॉ. अश्विनी गौरकार- झाडे (वय 31) यांचे जागीच निधन झाले. तर डॉ. अतुल गौरकार (वय 34) हे 1 तास तसेच रस्त्यावर पडून होते. तरीही, लोकांनी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी विलंब केला. हा विलंब टाळला असता तर कदाचित डॉ. अतुल गौरकार यांचा जीव बचावला जाऊ शकला असता, अशा भावना काही जणांनी ‘विश्व भारत’कडे व्यक्त केल्या.
कसा झाला अपघात?
ही घटना वरोरा-भद्रावतीजवळ घडली. ते दोघे आपल्या चिमुकल्या बाळाला घरी आई वडीलाजवळ ठेवून वरोरा येथे स्वतःच्या चारचाकी वाहन क्रमांक MH-34- AM- 4240 ने वरोरा येथे गेले होते.
वरोरा हायवेवर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक MH- 34- BZ- 2996 ने समोरासमोर जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, कार तब्बल अर्धा किलोमीटर ट्रक ने खेचत नेली. या घटनेत डॉ. अश्विनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असल्याने डॉ. अतुल यांना उपचारार्थ हलविण्यात आले. चंद्रपूर ला नेत असताना भद्रावती जवळ डॉ. अतुल यांचा मृत्यू झाला. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. दोघांचाही स्वभाव मनमिळाऊ होता.