नागपूर जिल्ह्यातील मौदा-रामटेक महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोनजण ठार झाले आहेत. बारशाच्या कार्यक्रमाला जात असताना काका आणि पुतणीचा अपघात झाला. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. काकू मात्र वाचली आहे. त्यामुळे या कुटुंबावर दु;खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे.
टिप्परच्या धडकेत काका-पुतनी जागीच ठार
नागपूर जिल्ह्याच्या मौदा-रामटेक मार्गावर हा भीषण अपघात झाला. काका, काकू आणि पुतणी असे तिघेजण दुचाकीवरून बारशाच्या कार्यक्रमाला जात होते. मात्र, मध्येच टिप्परने कट मारली. त्यामुळे काकांचा तोल गेला आणि या तिघेही रोडवर आदळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला प्रचंड मार लागला. या अपघातात काका आणि पुतणीचा जागीच मृत्यू झाला. तर काकू या बचावल्या असून त्यांनाही गंभीर मार लागला आहे. काकांचं नाव शिवदास वंजारी असून पुतणीचं नाव श्रुती वंजारी असं आहे. काकू रेखा वंजारी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
12 महिला आणि 4 पुरुष जखमी
बीडमध्येही असाच भीषण अपघात झाला. दहाव्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वाहनाचा बीडच्या पाली जवळ अपघात झाला. या अपघातात 12 महिलांसह 4 पुरुष जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहने समोरासमोर आली. यात समोरून आलेल्या वाहनाने पिकपला हुलकावणी दिली. या घटनेत पिकअप रस्त्याच्या कडेला भिंतीवर धडकला. त्यामुळे 16 जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे. चौसाळा परिसरातील तेलंगशी गावातील लक्ष्मीबाई जायभाय यांचे निधन झाले होते. त्यांच्या दहाव्यासाठी निघालेल्या या पिकपचा अपघात झाला आहे.
विश्वभारत News Website