नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील नावलौकिक सी.पी.ॲन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लाखोटीया भुतडा सीबीएसई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती राऊत यांनी दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाचा अधिकार कायदा अंतर्गत प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. त्यांची दिशाभूल करुन नियमांचे उल्लंघन करीत त्यांच्या कडून सतत १२ वर्षा पासून लाखोंची वसुली केल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून लवकरच कारवाईचे संकेत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
कायदा काय?
RTE 25% प्रवेशाचे प्राथमिक उद्दीष्ट असे की, प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्रदान करणे आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार नामांकित खाजगी शाळांमधील प्राथमिक ते आठवी इयत्ते पर्यंतच्या २५% जागा आरटीई ॲडमिशन अंतर्गत राखीव आहेत.या कार्यक्रमामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च दर्जाचे शिक्षण मिळणे शक्य आहे.
काय घडले?
RTE 25% मोफत शिक्षण प्रवेश प्रक्रिया ही अगोदर ऑफलाईन पद्धतीने केली जात होती. याचाच फायदा घेत मुख्याध्यापिका यांनी पालकांकडून कागदपत्रे गोळा केले. मात्र RTE 25% मोफत शिक्षण प्रवेश प्राप्त झालेल्या पाल्यांच्या पालकांना याबाबत माहिती न देता, तसेच त्यांची दिशाभूल करुन ,मनमानी कारभार करीत RTE प्रवेश प्राप्त पाल्यांच्या पालकांकडून पैसे उकळले. ही बाब गंभीर असुन सदर शाळेमध्ये हा प्रकार घडल्याचे निष्पन्न होत आहे. मात्र पालक जागृत झाल्याने व अंगलट आल्याचे पाहून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला. यात अपयश आल्याचे लक्षात येताच अखेर शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती राऊत यांनी कोंढाळी व परीसरातील शेकडो विद्यार्थ्यांच्या घरी शाळेच्या लेटर पॅड वर सही शिक्का मारुन RTE 25 % मोफत शिक्षणाचा हक्क अंतर्गत प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांचे भरलेले रुपये परत घेऊन जावे, अशा प्रकारचे कबुली पत्र पाठविले. उपरोक्त पत्र वाचून अनेक पालकांना धक्काही बसला आहे.
विद्यार्थ्यांसोबत खेळ
अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की, इतक्या मोठ्या नावलौकिक शाळेने आमच्या सोबत धोका केला? तेव्हा याची सखोल चौकशी करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार बाहेर निघावा, अशी पालकांची इच्छा आहे. तसेच सदर शाळेमधील घडलेल्या अन्य घटनेचीही शिक्षण विभागाला लेखी तक्रार करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सदर शाळेवर कारवाई व्हावी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी,अशी मागणी केली जात आहे.
पालकांची लूटमार
नावलौकिक शाळेमध्ये असला प्रकार घडल्यामुळे सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळा शिक्षणाच्या नावाखाली फक्त बाजारीकरण करून लुटमारीचे मुख्य केंद्र बनले आहे.कोंढाळी व परीसरातील पालक वर्ग चिंताग्रस्त झाले असून आता मुलांना अशा महागड्या सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायला पाहिजे किंवा नाही ह्या संभ्रमात आहेत. यावर्षी शाळेच्या अनेक शिक्षक व शिक्षीका भर उन्हात विद्यार्थ्यांच्या शोधात घरो-घरी जाऊन शाळेचे गुण गाण करून प्रवेश घेण्यासाठी रेटा घालत होते. मात्र खरे तर आज शिक्षणाच्या नावावर ‘बोली सुरत, दिल के खोटे, नाम बडे और दर्शन खोटे’ अशी शाळेची अवस्था दिसत आहे.
विश्वभारत News Website