राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसमध्येही फूट पडणार का? याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे अनेक राजकीय नेतेच याविषयी विधानं करत आहेत, पण काँग्रेसनं मात्र ही चर्चा तथ्यहीन असल्याचं सांगत ही केवळ अफवा असल्याचा दावा केला आहे, त्यामुळे काँग्रेस फूटीच्या चर्चेवरुन पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेला पेव फुटल्याचं पाहायला मिळतंय.
शिवसेनेच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानंही भाजपशी हातमिळवणी करत सत्तेत सहभाग घेतला. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता काँग्रेसही फुटणार, काँग्रेसचा एक गट भाजपसोबत येणार, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. विरोधकांसह काही मित्रपक्षाचे नेतेही याबाबत विधानं करुन काँग्रेस फूटीचा अंदाज वर्तवत आहेत, पण काँग्रेस नेते मात्र या सर्व चर्चा फेटाळून लावत आहेत.
‘बदनाम फक्त आम्हीच का राहावं, अशी काहींची इच्छा असेल, म्हणून असे बेताल आणि बिनबुडाची वक्तव्य ऐकायला मिळतात, त्यात एक टक्कासुधा तथ्य नाही’, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. तर आमचे 45 पक्के आहेत, एकत्र काम करत आहेत. आमच्यात कोणतीही फूट नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. काँग्रेस एकसंध आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
दुसरीकडे ज्या पक्षाकडून काँग्रेस फोडलं जाण्याची चर्चा आहे, त्या भाजपनंही तूर्तास हा दावा फेटाळला आहे, ज्याची चर्चा होते ते घडत नाही, असं म्हणत फडणवीसांनीही काँग्रेस फुटीवर सूचक विधान केलंय. ज्या चर्चा होतात ते कधीच होत नाही आणि जे तुम्हाला माहिती नसतं तेच होतं, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
काँग्रेस आणि फडणवीस यांनी या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी ज्या तऱ्हेनं आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी फुटली, ते पाहता तरी महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडू शकतं? हे सांगणं अवघड बनल्याचं चित्र आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष एकसंध राहतो की फुटतो? याचं उत्तर येत्या काळातच मिळणार आहे.
विश्वभारत News Website