मनसे नेते अमित राज ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवार ते अहमदनगर आणि शिर्डीला गेले होते. समृद्धी महामार्गावरून नाशिककडे परतत असताना सिन्नर तालुक्यातील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची कार कर्मचाऱ्यांनी अडवली. त्यानंतर मनसेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली होती. तर, विदर्भातील काही टोलनाकेही बंद करा, अशी मागणी आता जोर धरत आहे. आता यावर अमित ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
अमित ठाकरे म्हणाले, “शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यावर नाशिकमध्ये काम असल्याने निघालो होतो. समृद्धी महामार्गावरून जात असताना सिन्नर येथील टोलनाक्यावर कार थांबवण्यात आली. कारला फास्टटॅग असतानाही टोलनाक्यावरील फाटक उचलण्यात आलं नाही.”
“टोलनाकावाल्यांची काहीतरी तांत्रिक अडचण होती. तेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी गाडी का थांबवली? असे विचारलं. त्यावर तांत्रिक कारण असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. पण, टोलनाक्यावरील कर्मचारी उद्घट बोलत होते. कर्मचाऱ्याने मॅनेजरला फोन केल्यावर तो सुद्धा उद्धट भाषेत बोलत होता,” असं अमित ठाकरे यांनी म्हटलं.
“१० ते १५ मिनिटानंतर टोल नाक्यावरून गाडी सोडण्यात आली. पण, हॉटेलला पोहचल्यानंतर कळलं की टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्यामुळे ६५ टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक बंद झाला,” अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी हसत दिली आहे. तर नागपूर-अमरावती, वर्धा, भंडारा रोडवरील टोलनाके बंद करा, अशी मागणी जोर धरत आहे.