तलाठी पदासाठीच्या ऑनलाइन परीक्षेचे ‘सर्व्हर’ सकाळी बंद पडल्यामुळे राज्यभर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या प्रकाराची दखल आमदार बच्चू कडू यांनी घेतली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे बच्चू कडूंनी सांगितले.
अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना आमदार कडू म्हणाले, या परीक्षा प्रामाणिकपणे घेतल्या गेल्या पाहिजे. त्यामध्ये जर कुणी बेईमानी करत असेल, तर त्याच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. कारवाई करण्यासाठी सरकारने जरी मागेपुढे पाहिले. तर त्याच्या विरोधात उभे राहण्याची आमची तयारी आहे.
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि तलाठीच्या परीक्षा या सध्याच्या कंपनीच्या माध्यमातून घ्याव्या. त्यानंतरच्या परीक्षा मार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या गेल्या पाहिजे. केरळच्या धर्तीवर घेतल्या गेल्या पाहिजे. विद्यार्थ्यांकडून वर्षाला फक्त एक हजार रुपये शुल्क घेतले गेले पाहिजे, असेही बच्चू कडू म्हणाले.
विद्यार्थ्यांकडून एवढे शुल्क घेतले असतानाही परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या ढिसाळ कारभारावर राज्यभर संताप व्यक्त होत असतानाच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत ‘सर्व्हर डाऊन’ प्रकाराची चौकशी केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. याबाबत विखे यांनी सरकारने नेमलेल्या तलाठी भरती परीक्षेपासून कोणताही परीक्षार्थी वंचित राहणार नाही, असेही सांगितले.
परीक्षार्थींना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच, यापुढील सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार सुरळीत पार पडतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातील सर्व तलाठी भरतीसाठी आज होणाऱ्या उर्वरित दोन्ही सत्रांतील परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरू झाल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली.
‘सर्व्हर डाऊन’ घटनेची चौकशी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्फत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच पुढील सर्व परीक्षा वेळापत्रकानुसार सुरळीत पाडण्यासाठी विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.