राज्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. शासनाकडून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु आचारसंहितेमुळे नियुक्ती देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यासाठी राज्य शासन केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती करण्याच्या विचारात असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांकडून मिळाली. त्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत.
राज्यातील विविध शासकीय विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहे. त्याचा कामावर परिणाम होत आहे. शासनाकडून जागा भरतीसाठी जाहिराती काढण्यात आल्या. परंतु विविध कारणामुळे भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही. मागील वर्षी शासनाने ७५ हजार पदभरतीची घोषणा केली. विविध विभागाकडून जाहिराती काढून परीक्षाही घेण्यात आल्या.
काही परीक्षांमध्ये घोळ झाल्याचे आरोप झाले. दरम्यानच्या काळात अनेक विभागाचे निकाल प्रसिद्ध करण्यात आले. कागदपत्रांची तपासणीचे काम पूर्ण करण्यात आले. काहींनी नियुक्तीपत्री देण्यात आले. परंतु १६ मार्चपासून लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेच्या काळात भरती प्रक्रिया राबवता येत नाही.
त्यामुळे नियुक्ती देण्याची कार्यवाही थांबवण्यात आली. महसूल, ग्राम विकास, वन, शिक्षणसह अनेक विभागातील पात्र उमेदवारांनी नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. फक्त नियुक्तीपत्र देणे शिल्लक आहे. त्यामुळे हे नियुक्तीपत्र देण्यास परवानगी देण्यासाठी राज्य शासन केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांकडून समजले.