Breaking News

मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विधानसभा लढण्याच्या तयारीत?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी खतगावकर यांनी मुखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. खतगावकर व त्यांच्या हितचिंतकांनी मुखेडमध्ये संपर्क वाढविला असून अलीकडेच त्यांचे कार्यालय तेथे सुरू झाले आहे.

 

नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये आजी-माजी आमदारांसोबतच राजकीय क्षेत्रांतील अनेक कार्यकर्ते आमदारकीसाठी सक्रीय झाल्याचे दिसत असताना ३२ वर्षांहून अधिक काळ शासकीय सेवेत राहिलेल्या खतगावकर यांनी राजकीय पाऊल टाकल्याचे दोन महिन्यांपूर्वी स्पष्ट झाले होते. ते मुखेडशेजारच्या बिलोली तालुक्यातील खतगावचे रहिवासी आहेत; पण हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे राजकीय पदार्पणासाठी त्यांना मुखेडचा पर्याय देण्यात आला. भाजपाचे एक माजी जिल्हाध्यक्ष व त्यांच्या गटाचे खतगावकर यांच्या उमेदवारीला समर्थन असल्याचे सांगण्यात येते.

 

सन २०१४ पासून मुखेड मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. आगामी विधानसभेसाठी महायुतीच्या जागा वाटपात या मतदारसंघावर पहिला दावा भाजपाचाच राहणार असून या पक्षाचे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड हे आपल्या तिसर्‍या निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत. त्यांनी मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमांचा धडाका सुरू केलेला असतानाच मुख्यमंत्र्याच्या सचिवालयात कार्यरत असलेल्या खतगावकर यांचे नाव मुखेडच्या संभाव्य उमेदवारांत घेतले जात असल्यामुळे खासदार अशोक चव्हाण यांच्यासह भाजपाचे अनेक नेते बुचकाळ्यात पडले आहेत.

 

अलीकडच्या काळात खतगावकर यांनी मुखेड-देगलूरला अनेकदा भेट दिली. त्यांच्या पुढाकारातून काही मोठे कार्यक्रमही मुखेड येथे पार पडले. त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई उपस्थित राहिल्यानंतर खतगावकर यांच्या उमेदवारीची चर्चा वेगवेगळ्या माध्यमांतून सुरू झाली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत माजी सनदी अधिकारी शामसुंदर शिंदे यांनी लोहा-कंधार मतदारसंघातून विधानभवनात प्रवेश केला. सरकारी सेवेत राहिलेले डॉ. माधव किन्हाळकर हेही मागील काळात दोनवेळा आमदार झाले. त्यानंतर खतगावकर यांच्या रुपाने जिल्ह्यातील आणखी एक अधिकारी विधानभवनात जाण्याच्या प्रयत्नात आहे.

 

मुखेड हा २००९ पासून सर्वसाधारण मतदारसंघ आहे. १९६२ ते २००४ पर्यंत हा मतदारसंघ राखीव होता. या मतदारसंघावर दीर्घकाळ काँग्रेसचा वरचष्मा राहिला. पण या मतदारसंघात कोणत्याही पक्षाची एकच व्यक्ती सलग तीनवेळा निवडून आलेली नाही. एका परिवारातील दोन सदस्यांना मतदारांनी तीनवेळा संधी दिली. पण नंतरच्या निवडणुकीत या परिवाराला नाकारल्याचा इतिहास आहे. गेल्या १० वर्षांतल्या तीन निवडणुकांत राठोड परिवाराला संधी मिळाली. त्यापूर्वी १९८० ते ९५ या काळात घाटे परिवाराला अशीच संधी मिळाली होती. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत मतदार कुणाला कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

About विश्व भारत

Check Also

अमरावती में काँग्रेस का धरना : राहुल गांधी के खिलाफ अभद्र टिप्पणी करने वालों के खिलाफ केस दर्ज

अमरावती में काँग्रेस का धरना : राहुल गांधी के खिलाफ अभद्र टिप्पणी करने वालों के …

केजरीवाल को लेकर उद्धव ठाकरे ने BJP पर साधा निशाना

केजरीवाल को लेकर उद्धव ठाकरे ने BJP पर साधा निशाना टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *