राजुरा,
एक एकर जागा विकल्याच्या कारणावरून मुलाने बंडीच्या उभारीने वडिलाची हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी विरूर परिसरातील जंगल भागातील रेल्वे रूळावर मृतदेह फेकला. नात्याला काळीमा फासणारी ही घटना बुधवार, 19 मे रोजी राजुरा तालुक्यातील सिंधी या गावात उघडकीस आली. या घटनेचा अवघ्या दोन तासात छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. याप्रकरणी आरोपीस मुलास अटक करण्यात आली. तिरूपती तानोबा धानोरकर असे मृतकाचे नाव असून, निखिल धानोरकर असे आरोपी मुलाचे नाव आहे.
राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे.) पोलिस ठाणे हद्दीतील सिंधी गावालगतच्या जंगल परिसरातील रेल्वे रुळावर एका अज्ञात इसमाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना समोर आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आला. प्रारंभी मृतकाची ओळख पटविल्या गेली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंधी गाव गाठून मृतकाचे घर गाठले. रस्त्याने जात असताना पाऊलवाटेवर रक्ताचे डाग दिसून आले. मृतकाच्या घराचे निरीक्षक केले असता, दिवाणच्या पायावर व आलमारीवरही रक्ताचे डाग होते. शिवाय आरोपीच्या दुचाकीवरही रक्ताचे डाग दिसले. त्यावरून पोलिसांना ही हत्याच असल्याची खात्री झाली. प्रारंभी आरोपीस विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. खाकीचा धाक दाखविताचे त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जागेच्या वादातून ही हत्या केली असून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कमरेला बांधून रेल्वे पटरीवर टाकल्याची बाब आरोपीने मान्य केली.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, राजेंद्र खनके, महेंद्र भूजाडे, नईम पठाण यांनी केली.
जागेच्या वादातून वडिलाची हत्या , पुरावा नष्ट करण्यासाठी रेल्वे रूळावर फेकला मृतदेह
Advertisements
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website