जात पंचायतीच्या बहिष्कारप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
चंद्रपूर,
जर कुणी पार्थिवाला खांदा दिला, तर त्याला जातीबाहेर काढल्या जाईल, असा फतवाच जात पंचायतीने काढल्याप्रकरणी अखेर मृतक प्रकाश ओंगले यांच्या मुलाला आपल्या वडिलाच्या पार्थिवाला खांदा द्यावा लागला होता. नंतर याबाबतच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी बुधवारी सात जणांविरूद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्यानुसार कलम 5, 6 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी सुरेश वैराडकर, विनोद वैराडकर, सुरेश गंगावणे, प्रेम गंगावणे, मोहन ओगले, अशोक गंगावणे आणि कैलास वैराडकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. महानगरातील भंगाराम वॉर्ड परिसरातील रहिवासी प्रकाश ओगले यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. याबाबतचा निरोप नातलगांना देण्यात आला. मात्र, गेल्या 15 वर्षांपासून प्रकाश ओगले भोगत असलेला जात पंचायतीचा बहिष्कार त्यांच्या मरणोपरांत पुन्हा एकदा आड आला.
गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्यांना 7 मुली आणि 2 मुले होती. त्यामुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न, कार्यक्रमांना जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला, आर्थिक दंड लावला. मात्र, प्रकाश ओगले यांनी दंड भरला नाही आणि हा बहिष्कार त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही कायम राहिला. मात्र, स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या त्यांच्या जयश्री या मुलीने जात पंचायतीला सणसणीत चपराक लावत आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याचा निर्णय घेतला.
गोंधळी समाजाच्या जात पंचायतीच्या या जाचाविरूद्ध काही सामाजिक कार्यकर्ते लढा देत आहेत. त्यांच्या मते समाजातील गरिबांकडून पैसे लुबाडणे, बहिष्कार टाकणे आणि त्यामाध्यमातून संपूर्ण समाजावर आपली दहशत बसविण्याचे काम जात पंचायत करते, असा आरोपही काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला गेला.
दरम्यान, आ. किशोर जोरगेवार यांनी ओगले कुटुंबियांची भेट घेवून सात्वन केले. जातपंचायतीच्या लोकांवर कार्यवाही करा, अशी मागणी त्यांनी केली होती. या पृष्ठभूमीवर ओगले यांच्या मुलाने शहर पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीन्वये सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांनी दिली