महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जवळपास 20 प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यापैकी कालबाह्य मानल्या जात असलेल्या टंकलेखन अर्थात टायपिंगचाही समावेश आहे. वर्षातून दोन वेळा टकटक टायपिंग परीक्षा होते. एका वेळी 2 लाख 87 हजार परीक्षार्थी असतात. त्यांच्याकडून परीक्षा शुल्कापोटी 12 कोटी 49 लाख रुपयांचे उत्पन्न परिषदेला मिळते.
वर्षाकाठी हे उत्पन्न 25 कोटींच्या घरात असते. तरीही येत्या परीक्षेपासून परिषदेने परीक्षार्थींचे शुल्क दामदुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दशकांत सर्वत्र संगणकीकरण झाले आहे. त्यामुळे आता वर्षानुवर्षे टंकलेखनाच्या टकटकची गरजच काय, असा सवाल बहुतांश जणांना पडतच असेल. पण संगणकावर आपल्या कामाचा वेग जरी वाढला तरी टायपिंगची स्पीड मोजण्यासाठी अन् विशेषत: कारकुनाची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी टंकलेखनाचे महत्त्व अजूनही अबाधित आहे.
अनुदान कधी?
नवीन शासन निर्णयामुळे इन्स्टिट्यूटला मान्यतेसाठी आणि नूतनीकरणासाठीच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. मात्र या सर्वात इन्स्टिट्यूटला कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. टंकलेखन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व त्यांच्या करिअरसाठी महत्त्वाचे आहे. नवीन नियमांमध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी आहे.
परीक्षार्थींच्या संख्येत घट
परीक्षा परिषदेला टंकलेखन परीक्षेच्या विद्यार्थी शुल्कातून 12 कोटी रुपये मिळाले. मात्र गेल्या 2 वर्षांत कोरोनामुळे इन्स्टिट्यूट बंद असल्याने परीक्षार्थींची संख्या घटली.