विदर्भातील नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील अंभोरा हे पुराणकाळापासून प्राचीन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथील विकासासाठी राज्य सरकारने अलीकडेच कोट्यवधी निधी देण्याची घोषणा केली. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु असताना एकही रुपया अजूनही मिळालेला नाही. तसेच अख्ख अंभोरा गावात विजेचा लपंडाव दिसतोय. रस्त्यांची दैनावस्था झालेली आहे. येथील उंच आणि देखणा पूल अजूनही उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी)दुर्लक्ष दिसून येत आहे.
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरपासून केवळ ७५ किमी तर भंडारापासून २० किमी अंतरावर असल्याने दोन्ही जिल्ह्यातील खाजगी व सरकारी बसफेऱ्या सातत्याने सुरू असतात. दोन्ही जिल्ह्याची सीमारेषा येथे वैनगंगा नदी झाली आहे. आंब (अम्भ) म्हणजे पाणी आणि पाण्याने भरलेले जलप्रदेश म्हणजे अंभोरा होय. अंभोरा मुख्यतः त्याच्या जलसमृध्दीसाठीच प्रसिद्ध आहे. येथील नावेचा प्रवास रोमांचित करणारा आहे.
अंभोऱ्याचा इतिहास काय आहे?
निसर्गाचे अमीटरूप अंभोरा येथे अनुभवता येथे. येथील प्रभू शिवाचे चैतन्यरूप चैतन्येश्वराच्या चैतन्यमयी वातावरणात अनुभवता येथे. वेलतूरपासून पुढे जाताना नजरेत भरत जाणारा निसर्ग अप्रतिम आहे. रस्त्याच्या एका कडेला समांतर उभी डोंगरमाळ व दुसऱ्या बाजूने पसरलेली भातशेती. पलीकडे वैणगंगेच्या धरणाच्या बॅक वॉटरने वटारलेले विशाल पात्र व परिसरातील जलसमृध्द तलाव, बोळ्या मन मोहरूवून टाकतात.
अंभोरा प्रथम नजरेत उतरतो तो कोलेश्वराच्या पहाडावरील छोट्याशा वाटणाऱ्या मंदिराने. त्याचे दर्शन बहुतेक पर्यटक दुरूनच करून नतमस्तक होतात. त्याचा कळस मागील वर्षी पावसाळ्यात कलंडला आता गाभारा कधीही कलंडू शकतो. गिर्यारोहणाची आवड असणाऱ्यांना त्याची उभी कडा नेहमीच आवाहन ठरते. ते आवाहन पेलणारे अनेक पर्यटक त्याचे टोक गाठून समुद्र सपाटीपासून २,५०० फूट उंची वरून वैणगंगेच्या झालेला समुद्र अनुभवतात. सोबत मोठ्या मोठ्या दगडावर पायसोडून बसत नागपूर-अंभोऱ्याला जाणाऱ्या पुढल्या रस्त्यावरची रहदारी करणारी इवली-इवली वाहणे व माणसे न्याहाळतात.
अंभोरा येथे पाय ठेवताच उजवीकडे वैनगंगेचे विस्तीर्ण पात्र दिसते. त्यात सुरू असलेली मासेमारीही खुणावते. डावीकडे आधीच नजरेत भरलेल्या कोलासुराची अजस्त्र शिवलिंग रूपी कडा उभी ठाकते तर पुढ्यात चैतन्येश्वराच्या देखणा ब्रम्हगिरी पहाडावरील देखणा उंच कळस आकृष्ट करतो. आम नदी जेथे वैणगंगेस आलिगंन देते त्या ठिकाणी डोंगराची एक जलसमाधीस्तव अजस्त्र रांगच आडवी पसरलेली आहे.
राम-लक्ष्मण व सीतेने याच नदी तीराने केला परतीचा प्रवास
लाखो वर्षांपूर्वी वैणगंगेच्या प्रवाहाने ती फोडून मार्ग आक्रमिला असावा. डोंगररागेचा एक विशालकाय पाढरा प्रस्तरखंड वैणगंगेच्या प्रवाहात उभा आहे. पूर्वी तो चहूबाजूंनी पाण्याने वेढला होता. त्यामुळे त्याला बेटाचे स्वरूप होते. अलीकडील सौंदर्यीकरणात आमनंदीचा ओकारी आकार घेतलेला प्रवाह बुजवण्यात आल्याने बेटाचे ते रूप नष्ट झाले आहे. पूर्वी येथे नावेनिच जावे लागे. आता ते इतिहास जमा झाले असून, त्याने आधुनिकीकरणाची सुंदर शाल पांघरली आहे. रामायणात राम-लक्ष्मण व सीतेने याच नदी तीराने परतीचा प्रवास केला होता. तर महाभारतातील पाडंवाणी वनवासातील काही काळ परिसरात घालविल्याचे अनेक पुरावे पुढे आले आहेत.
आम-कन्हान व वैनगंगेचे त्रिवेणी संगम
प्रस्तरखंडाच्या उचंटोकावर हेमाडपंती धाटणीचे शिवमंदिर असून, रुद्राक्षरूपातील विशाल शिवलिंग आहे. गाभारा व समोरील अंतराळ एवढाच भाग हेमाडपंती बांधणीचा आता तेथे उरला आहे. उर्वरित भाग ब्रिटिश अमदानीत बांधला गेला आहे. गाभारा समोरचे नक्षीदार खांबाचे सभामंडप कलाप्रेमींना प्रेमात पाडते. तेथून दिसणारे आम-कन्हान व वैनगंगेचे त्रिवेणी संगम त्यांचे एकमेकांत मिसळताना पाहणे एक नवी निसर्गानुभूती देऊन जाते.
कुंडातून वाहते बारमाही पाणी
हिवाळ्यात स्थानिक व प्रवासी पानपक्षाच्या मनोहारी जलक्रीडाही येथून न्याहळता येतात. कोलासुराच्या पहाडीत अनेक शांत स्थले आहेत. झिरी (झरी) त्यातला एक. डोंगराच्या पोटात नैसर्गिक रित्या निर्माण झालेले एक निसर्गनिर्मित शैलाश्रय असून आत भाविकांची शिवलिंग स्थापिले आहे. खाली एक दंगडी कुंड बांधलेला आहे. त्यातून बारमाही पाणी वाहात असते, हे विशेष.
राहण्यासाठी धर्मशाळा व यात्री निवास
महाराष्ट्र शासनाने पर्यटनस्थळ म्हणून घोषित केलेल्या या स्थानी निवास व पारंपरिक भाजी-भाकरीची उत्तम सोय आहे. यातून ग्रामस्थांनी रोजगार मिळविला आहे. गोसेखुर्द धरणाने प्रभावित झाल्यानंतर रोजीरोटीचे साधन म्हणून मासेमारी स्वीकारली आहे. बांधकाम विभाग, पर्यटन विभाग यासह मंदिराच्या धर्मशाळा व यात्री निवास येथे आहेत. अलीकडे येथे बांधण्यात आलेले पर्यटन संकुल अंभोरा प्रेमीच्या गळ्यातले ताईत बनले आहे.
विश्वभारत News Website