विश्व भारत ऑनलाईन :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची घोषणा केली.मात्र,पालकमंत्रीपदाच्या यादीवर नजर टाकल्यास सिंधुदुर्गबाबत आश्चर्यकारक बदल पहायला मिळतो. सिंधुदुर्गमधून आमदार असलेल्या आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापूर तसेच मुंबईचे पालकमंत्री म्हणून संधी देत शिंदे-फडणवीसांनी आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याचवेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून ठाणे जिल्ह्यातून आमदार असलेल्या रविंद्र चव्हाण यांना जबाबदारी देण्यात आली आहे. या खेळीतून असे लक्षात येते की, दीपक केसरकर यांना दूर ठेवण्यात नारायण राणे यांना यश आले आहे.
राणे-केसरकर वाद सिंधुदुर्गला नवीन नाही. सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष असल्यापासून केसरकर आणि राणे यांच्यात राजकीय वैर होते. त्यानंतर 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे असलेल्या केसरकर आणि राणेंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समेट घडवून आणला. त्यामुळे केसरकरांचा विधानसभेतील पहिला विजय सुकर झाला. 2014 साली केसरकरांनी शिवसेनेत उडी घेतली आणि या वादाला आणखी खतपाणी मिळाले.
यापूर्वी केसरकरांनी राजकीय दहशतवाद असे म्हणत कायमच राणे यांना लक्ष्य केलेले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राणेंच्या विरोधात केसरकर यांनी चांगलेच वातावरण तापवले. राणेंनी दहशतवाद निर्माण केल्याचा मुद्दा कायम प्रचारात ठेवला आणि याचा फटका बसून राणेंचा पराभव झाला. या पराभवाचे शल्य आजही राणे अनेकदा जाहीररित्या बोलून दाखवितात. अलिकडेच शिंदे-भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यानंतरही केसरकर-राणे वाद महाराष्ट्राने पाहिला होता. त्यानंतर राणेंवर टीका करणार नाही, अशी भूमिका केसरकरांनी घेतली.