विश्व भारत ऑनलाईन :
गोंदिया जिल्ह्यात आदिवासी शाळेतील 120 मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळा प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे जवळपास दहा विद्यार्थी-विद्यार्थींनीची प्रकृती बिघडली आहे.
गाडीत श्वास घ्यायला जागा मिळत नसल्याने काही विद्यार्थी-विद्यार्थींनी बेशुद्ध झाल्या. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली. देवरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राचलवार यांनी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले आहेत. ट्रकमधील गर्दीमुळे विद्यार्थी गुदमरल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगितले.
नियोजन अभाव
गोंदिया तालुक्यातील शासकीय आदिवासी शाळा, मजितपूर येथील विद्यार्थ्यांना अमानवी पद्धतीने ट्रकध्ये कोंबण्यात आले होते. या सर्वांना कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी शाळा प्रशासनातर्फे नेले जात होते. तिथून परतत असताना हा प्रकार घडला. परत असताना काही विद्यार्थी बेशुद्ध पडले आणि गाडीत गोंधळ उडाला. अखेर गाडी थांबवण्यात आली.
शाळेवर कारवाई ?
मुले बेशुद्ध पडल्यामुळे तातडीने सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर एका मुलीला उपचारासाठी गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शाळा प्रशासन एकाच गाडीत तब्बल 120 मुलांना कसे काय कोंबू शकते, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे. यावर आता प्रशासन काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.