विश्व भारत ऑनलाईन :
काँग्रेस नेते राहुल गांधीची भारत जोडो पदयात्रा सात नोव्हेंबर रोजी तेलंगणातून महाराष्ट्रात येत आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत ते नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलडाण्यात 382 किलोमीटर चालतील. त्यापैकी 208 किमी नांदेड, हिंगोली जिल्ह्यात चालणार आहेत.
गांधी सात नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलूरला मुक्कामी असतील. 8 तारखेला पदयात्रा सुरू होईल. दुपारी ते अटकळी गावात भोजन करून शंकरनगरला मुक्काम करतील. 9 तारखेला नायगावमध्ये जेवण, वजीरगाव फाटा येथे मुक्काम आहे. 10 तारखेला ते नांदेड शहरात पदयात्रा काढून सायंकाळी नवा मोंढा येथे जाहीर सभा घेतील आणि महादेव पिंपळगावला जातील. 11 तारखेला पारडी मक्ता वारंगा फाटामार्गे हिंगोलीला पोहोचतील. 12 तारखेला दाती फाटा ते कळमनुरी पायी चालून मुक्काम करतील. तेथे काॅर्नर सभाही होईल. 13 तारखेला कळमनुरी ते हिंगोली प्रवास वळद पाटी येथे मुक्काम असेल. 14 तारखेला राहुल गांधी आराम करतील, अशी माहिती आहे.
शेगावला देणार भेट
शेगाव येथे प्रसिद्ध गजानन महाराजांचे दर्शन राहुल घेणार आहेत. यात्रा नेमकी कशासाठी आहे, हे काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना समजावून सांगण्यासाठी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 11 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.