राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात 19 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. सध्या तरी दोन आठवड्यांची कार्यक्रम पत्रिका तयार झाली आहे.
अधिवेशन म्हटले की रविभवन येथील काॅटेज मिळवण्यासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ लागते. ज्येष्ठनेनुसार बंगले मिळावे यासाठी प्रसंगी रूसवे फुगवे, मानापमानही होतात. उपमुख्यमंत्र्यांना “देवगिरी’ हा बंगला दिला जातो. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना हा बंगला मिळेल. कॅबीनेट मंत्र्यांसाठी रविभवन आणि राज्यमंत्र्यांसाठी नागभवन आहे.
दहाच मंत्री
यावर्षी मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वगळून 10 मंत्री असल्याने फारसे मानापमान होणार नाही असे चित्र आहे. तर राज्यमंत्री एकही नाही. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अधुनमधून होत राहते. तसे संकेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देत राहतात. खरेच हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला तर चढाओढ होऊ शकते. पण, तुर्तास तरी तशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे सध्या आमदार असलेल्या अनेक माजी मंत्र्यांना आमदार निवासात राहावे लागू शकते.
3 वर्षांपासून अधिवेशन नाही
गेली तीन वर्षे नागपुरात अधिवेशन झालेले नाही. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असल्याचे सर्वांच्या नजरा या अधिवेशनाकडे लागून राहिल्या आहे. मुंबईत पार पडलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान आमदारांच्या वर्तणुकीचा मुद्दा चांगलाच गाजला. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकादेखील केली. अखेर याची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या वागणुकीसाठी नियमावली ठरविण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती. या अधिवेशनात त्यासंबंधी काही होते का हे पाहावे लागेल.
मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा
महाविकास आघाडीच्या काळात प्रारंभी सहाच मंत्री होते. त्यावेळीही बंगल्यांवरून मानापमान झाला नव्हता. तर एकनाथ शिंदे यांनी बंड करीत भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच मंत्री होते. त्यावरून विरोधकांनी खूप टिका केली. बऱ्याच काळा नंतर मुंबई अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्या नंतर आता दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे.