तेलंगण राज्यातील वारंगळ शहरातील एक अतिशय हृदयद्रावर घटना घडली आहे.या शहरात एक आठ वर्षीय मुलाचा चॉकलेट खात असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे चॉकलेट या मुलाच्या वडिलांनी परदेशातून आणले असल्याचे समजते.
संदीप सिंह असे या ८ वर्षीय मुलाचे नाव आहे. संदीप हा आपल्या वडिलांनी आणलेले चॉकलेट खात होता. मात्र चॉकलेटचा एक तुकडा त्याच्या गळ्यात अडकला. संदीपला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. श्वास घेण्यासाठी मग संदीप तडफडू लागला.
संदीप तडफडू लागल्यानंतर तो तुकडा काढण्याचा त्याच्या कुटुंबीयांनी प्रयत्न केले. खूप प्रयत्न केल्यानंतर संदीपच्या गळ्यात अडकलेला चॉकलेटचा तुकडा गळ्याच्या खालीही सरकला नाही आणि तो तोंडातून बाहेरही आला नाही. संदीपची बिघडत चाललेली स्थिती पाहून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केले.