शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. संजय राऊत अलीकडेच तुरुंगातून बाहेर आले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली होती. या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे.
प्रकरण काय?
३० मार्च २०१८ मध्ये बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयाने राऊतांना समन्स बजावला आहे. १ डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात हजर न झाल्यास त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
बेळगाव न्यायालयाने समन्स दिल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. “बेळगाव येथील न्यायालयात बोलवून मला अटक करण्याचं कटकारस्थान रचलं जात आहे. दोन दिवसांपूर्वी याबाबतची माहिती माझ्या कानावर आली आहे” असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. २०१८ साली केलेल्या भाषणात आक्षेपार्ह काय होतं, तेच कळलं नाही, असंही राऊत म्हणाले.